लॉकडाऊन काळात 'हे' राज्य घेतंय १२ वी परीक्षा!

केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविला आहे. सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, असेही एक राज्य आहे जेथे लॉकडाऊन दरम्यान बोर्ड परीक्षा घेण्यात येणार आहेत! खुद्द राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनीच ही घोषणा केली आहे. देशभरातील सीबीएसई, आयसीएसई, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान यासह अनेक राज्यांच्या बोर्ड परीक्षा लॉकडाऊनमुळे मध्यातच अडकल्या आहेत. मात्र लॉकडाऊन असतानाही राहिलेल्या बोर्डाच्या परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय मिझोराम राज्याने घेतला आहे. शिक्षणमंत्री लालचंदमा राल्ते यांनी जाहीर केले आहे की हायस्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट (एचएसएसएलसी) अर्थात इयत्ता १२ वी बोर्डाची परीक्षा २२ एप्रिलपासून सुरू होईल. ते म्हणाले की, 'ही परीक्षा लॉकडाऊनमुळे थांबली होती. आता २२ एप्रिलपासून पुन्हा सुरू होईल आणि २४ एप्रिलपर्यंत चालेल. जे शिल्लक आहेत त्या तीन विषयांची परीक्षा राज्यातील ८४ केंद्रांवर घेण्यात येणार आहे.' मिझोरममध्ये देखील इतर सर्व वर्गांसाठी ऑनलाइन वर्ग चालवले जात आहेत. टीव्हीवर शिक्षणाशी संबंधित कार्यक्रमही सुरू आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐजवाल दूरदर्शन केंद्रावरून दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत विज्ञान आणि गणिताच्या वर्गांचे प्रसारण केले जाते. पुढील आठवड्यापासून नववीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू केले जाणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RHdSRD
via IFTTT

Post a Comment

0 Comments