आयटीआयमध्ये ७०० पदांसाठी मेगाभरती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई लॉकडाउनमुळे देशातील उद्योग व्यावसाय बंद पडले. कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. देशात रोजगाराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) ७०० पदांची भरती करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असल्याचे समजते. यात खासगी आयटीआयच्या जागा भरण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अशासकीय प्राचार्य व कर्मचारी संघटनेचे केली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर दोन महिन्यात ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. लॉकडाउनपूर्वी ७०० पदे भरण्याचे आदेश सरकारने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला दिले होते. मात्र, संचालनालयाने दिरंगाई केल्यामुळे १३ एप्रिलला पुन्हा स्मरणपत्र पाठवण्यात आले. पदभरती करून निवड केलेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती आदेश द्यावे, असे पत्राद्वारे सांगण्यात आले. लॉकडाउनमुळे सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे कोणत्या संस्थेत किती जागा रिक्त आहेत, विषयानुसार आवश्यक असलेली निदेशक यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया शासकीय स्तरावर सुरू आहे. या नोकरभरतीमध्ये आपल्यालाही स्थान मिळावे यासाठी विनाअनुदानित म्हणजे खासगी आयटीआय संस्था आक्रमक झाल्या आहेत. शासन मान्यताप्राप्त विनाअनुदानित तत्त्वावर चालू असलेल्या खासगी आयटीआयमधील अनुभवी निदेशकांना प्राधान्य द्यावे व गेल्या ३५ वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेने केली आहे, असे राज्याध्यक्ष संजय बोरस्ते यांनी सांगितले. शासकीय आयटीआयमध्ये दोन हजारच्या जवळपास निदेशकांच्या जागा रिक्त आहेत. शासन अनुभवी नसलेल्या तासिकांवर आधारित निदेशक भरती करून कामचलाऊ धोरण घेत आहे. त्यांनाही नोकरीची शास्वती नसल्याने ते कितपत योगदान देत असतील हा संशोधनाचा भाग होईल. गेली ३५ वर्षे जवळपास ४२५च्या आसपास खासगी आयटीआयमध्ये कायम विना अनुदान तत्त्वावर जवळपास हजारो निदेशक काम करीत आहे. त्यांच्यावर शासनाने ३५ वर्षांत एकही रुपयाचा खर्च केलेला नाही. या आयटीआयमधून हजारो विद्यार्थी शिकत आहे. अनेक वर्षांपासून हे कर्मचारी शासनाकडे अनुदान मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहे. लॉकडाउन कालावधीत विद्यार्थ्यांना वर्क फ्रॉम होम देऊन चांगले काम केले आहे, करीत आहेत. हे निदेशक अनुभवी असून प्रशिक्षित आहे. अशा कायम विनाअनुदानित आयटीआयमधील निदेशकांना शासकीय सेवेत सामावून घेऊन शासनाने न्याय द्यावा, अशीही मागणी संघटनेचे अध्यक्ष बोरस्ते यांनी केली आहे. निवड प्रक्रिया अशी होणार... कौशल्य विकास व उद्योग विभागाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे भरती प्रक्रिया होणार आहे. लॉकडाउन संपल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी भरती प्रक्रिया पार पडेल. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पदभरती होईल. निदेशकांची भरती दोन टप्प्यांत होणार आहे. प्रथम ८५ गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराची १५ गुणांची इन कॉमेरा मुलाखत घेतली जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखत चार दिवसांत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याचे समजते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eM6MoK
via IFTTT

Post a Comment

0 Comments