Also visit www.atgnews.com
विद्यापीठ आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर होणार
मुंबई: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सामंत म्हणाले, या समितीचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर केला जाईल त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. बैठकीत पदवी आणि पदव्युत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा १ जुलै ते १५ जुलै, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा २० ते ३० जुलै २०२० दरम्यान घेण्यात येतील का आणि या परीक्षांचा निकाल १५ ऑगस्ट पर्यंत जाहीर करून १ सप्टेंबर २०२० पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्यात येईल का या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच लॉकडाऊनचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी मानवी हजार दिवस (deemed to be attended) म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या. एम.फिल व पी.एचडी चा मौखिकी (viva) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करावयाची मुदत निघून गेली असल्यास त्यांना मुदतवाढ देण्यात येईल का यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील करोनाचा प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सामंत यांनी संगितले. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये समुपदेशन केंद्र राज्यातील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. समुपदेशन केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल, अशा सूचना सामंत यांनी यावेळी दिल्या. सीईटी परीक्षेसंदर्भात समिती गठीत बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. बारावी नंतर आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीने सर्व उपाययोजना करून आपले वेळापत्रक तयार करावे, असेही सामंत यांनी संगितले. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी सध्या असलेलं जिल्हा स्तरावरील सीईटी केंद्राची संख्या वाढवून प्रत्येक तालुका स्तरावर केंद्र तयार करण्यात यावे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला राज्यातील सर्व विद्यापीठांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या आकस्मित निधीतील काही रक्कम आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे.त्याबद्दल सर्वांचे आभारही . सामंत यांनी यावेळी मानले. या व्हिडिओ कॉन्फरन्सला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. अभय वाघ तसेच सर्व विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी झाले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ytZuph
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments