म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना राज्यपाल आणि कुलपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. याचबरोबर परीक्षांबाबत निर्णय घेण्याबाबत विद्यापीठांना स्वायत्तता आहे. असे असताना निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेपाबाबत उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांना समज द्यावी, असेही कोश्यारी यांनी पत्रात म्हटले आहे. विद्यापीठाच्या फक्त अंतिम वर्षाच्याच परीक्षा घेण्याच्या पर्याय विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्यानंतर राज्यातील कुलगुरू आणि अधिकाऱ्यांच्या समितीनेही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या आयोगाच्या निर्णय कायम ठेवला. त्यानुसार विद्यापीठांनी जुलैमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तयारीही सुरू केली. मात्र उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी भूमिका घेत विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवले. तसेच आयोगाचा निर्णय न आल्यास राज्याच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असेही जाहीर केले. या सर्व प्रकारावर राज्यपालांनी कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. 'विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अधिक वेळ घालवता अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत निर्णय घ्यावा. परीक्षा न घेणे हा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि विद्यापीठ कायद्याचा भंग आहे,' असेही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे 'उच्चशिक्षण मंत्र्यांच्या अनुचित हस्तक्षेपाबाबतही त्यांना समज देण्यात यावी,' असेही कोश्यारी यांनी स्पष्ट केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TvRDPn
via IFTTT