विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षांचे तळ्यात मळ्यात

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाशी सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर परीक्षांबाबत अनिश्चितता कायम असल्याचे चित्र आहे. विद्यापीठांनी पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत नेमके काय करावे, याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्री आणि कुलगुरू यांच्यातील मतभेद समोर आल्याचे सूत्रांकडून समजते. परीक्षांबाबत निर्णयासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या समितीने दोन दिवसांमध्ये एक प्रारूप आराखडा तयार करून हा अहवाल राज्यपाल आणि सरकारला सादर करावा, अशा सूचना सामंत यांनी बैठकीमध्ये दिल्या आहेत. कुलगुरू, मंत्र्यांमधील मतभेद उघड विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार राज्यात अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. मात्र करोनाची परिस्थिती नियंत्रणात येण्यास आणखी काही कालावधी लागेल, असे सांगत सामंत यांनी आयोगाला पत्र लिहून अंतिम सत्राची परीक्षा रद्द करण्याबाबत विनंती केली. यानंतर विद्यार्थ्यांमधील गोंधळ अधिक वाढला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राज्यपालांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सामंत यांना समज देण्याबाबत सांगितले होते. यानंतर सामंत यांनी सोमवारी कुलगुरूंची बैठक बोलावली. या बैठकीत ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असाच निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी यावेळी सांगितले. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना श्रेणी देऊन पुढे पाठवण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, सर्व कुलगुरूंनी त्यास विरोध करून तसे झाल्यास विद्यापीठांच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नामांकनावर परिणाम होऊ शकतो आणि ते विद्यार्थीहिताचेही नसेल असे मत मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यार्थीहिताला प्राधान्य हा निर्णय घेत असताना एकाही विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि भविष्याचा विचार करून त्यांना पुढे अडचणी येऊ नयेत, याचा विचार करण्यात येईल. शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय दर्जावरही याचा काही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि मानसिक स्थितीचा विचार करत अंतिम पाऊल टाकले जाईल, असे सामंत यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3go8zBa
via IFTTT

Post a Comment

0 Comments