परीक्षा रद्द करा; विद्यार्थ्यांचा सोशल मीडियावर एल्गार

विद्यापीठ अनुदान आयोगाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार देशातील सर्व विद्यापीठांना सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा निर्णय सोमवारी ६ जुलैला जसा जाहीर झाला तसा विद्यार्थ्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध करायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात तर पदवी परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता, पण हा आनंद फार काळ टिकलेला नाही. आता यूजीसीच्या निर्णयामुळे राज्यात परीक्षा होणार की नाही याची टांगती तलवार विद्यार्थ्यांपुढे आहे. विद्यार्थ्यांचा हा राग सोशल मीडियावर निघत आहे. #Cancel_Exam2020 #cancelfinalyearexam हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. वैयक्तिक एकेक विद्यार्थी तर या हॅशटॅगने आपली मते नोंदवत आहेतच, शिवाय अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) वगळता अन्य सर्व विद्यार्थी संघटनाही या निषेध आंदोलनात उतरल्या आहेत. 'ज्या दिवशी कोविड - १९ संक्रमणग्रस्तांच्या आकडेवारीत भारत जगाच्या पाठीवर तिसऱ्या क्रमांकावर आला, त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्रालयाने आणि यूजीसीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत मोजून घेतला गेला आहे. यूजीसीने परीक्षा रद्द करायला हव्यात,' असं मत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने (AISA) व्यक्त केलं आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, दिल्लीने देखील यूजीसीच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवला आहे. AISA ने या संपूर्ण प्रकरणाला अभाविपला जबाबदार धरलं आहे. महामारीच्या काळात परीक्षा महत्त्वाची वाटते का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय? डिजीटल डिव्हाइडचा बळी ठरलेल्या वंचितांचं काय? असे अनेक प्रश्न विद्यार्थी संघटना विचारत आहेत. आयआयटी मुंबई परीक्षा रद्द करू शकते तर विद्यापीठ का नाही, असा प्रश्न एनएसयूआय या काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने उपस्थित केला आहे. परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं मत एनएसयूआयने व्यक्त केलं आहे. काय आहेत यूजीसीची मार्गदर्शक तत्वे : - विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घ्याव्या. या परीक्षांसाठी विद्यापीठे ऑफलाइन किंवा ऑनलाइन किंवा दोन्ही पद्धतींचा अवलंब करू शकतात. - प्रत्येक विद्यार्थ्याला समान न्याय मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात जागतिक पातळीवर टीकाव धरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या संपूर्ण कौशल्यांचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. - या नवीन मार्गदर्शक सूचना आल्या तरी २९ एप्रिलच्या सूचना कायम राहतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2BMD5Fd
via IFTTT

Post a Comment

0 Comments