विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षा हव्या आहेत: शिक्षणमंत्री पोखरियाल

JEE NEET Exam: देशातील १७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीट परीक्षांचे प्रवेश पत्र डाऊनलोड केले आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा व्हायला हवी आहे, हेच यातून स्पष्ट होते, असे विधान केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मेडिकल, इंजिनीअरिंगची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोखरियाल यांनी हे विधान केले आहे. पोखरियाल म्हणाले, 'नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की ७ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्सचे अॅडमिट कार्डतर १० लाखांवर विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेचे अॅडमिट कार्ड डाऊनलोड केले आहे. यातूनच हे दिसून येतं की विद्यार्थ्यांना परीक्षा कोणत्याही किंमतीवर हवी आहे.' जेईई मेनसाठी परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आधी ५७० परीक्षा केंद्रे होती, ती आता ६६० करण्यात आली आहेत. नीटसाठी देखील परीक्षा केंद्रांची संख्या २,५४६ वरून वाढवून ३,८४३ करण्यात आली आहेत. जेईई ही संगणकीकृत परीक्षा असून नीट ही पेन-पेपर परीक्षा आहे. जेईई मेन परीक्षेला प्रति सत्र विद्यार्थी संख्या कमी करण्यात आली आहे. आधी प्रति सत्र १ लाख ३२ हजार विद्यार्थी देशभरात या परीक्षेला एका वेळी बसवण्यात येणार होते. ही संख्या आता कमी करून ८० हजारांवर आणण्यात आली आहे. परिणामी सत्रांची संख्या ८ वरून १२ पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती एनटीएने दिली आहे. 'ज्या पालकांना परीक्षा व्हावी असे वाटत आहे, अशा पालकांचे ई-मेलही आम्हाला आले आहेत. आमची मुलं गेली दोन-तीन वर्षे या परीक्षांचा अभ्यास करताहेत, त्यामुळे या परीक्षा व्हायला हव्यात असे या पालकांचे म्हणणे आहे,' असेही पोखरियाल म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32tzQvT
via IFTTT

Post a Comment

0 Comments