नीट, जेईई परीक्षांसंबंधी याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली: जेईई मेन २०२० आणि नीट यूजी परीक्षांसंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवार १७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. ही याचिका ६ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती. ११ विविध राज्यांमधील ११ विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ३ जुलै रोजी एका जाहीर निवेदनाद्वारे परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. हे प्रसिद्धी पत्रक रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. देशभरात कोविड - १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच जेईई आणि नीट परीक्षांचे आयोजन करण्यास केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. कोविड - १९ महामारीच्या काळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्यासारखे आहे, त्यामुळे या काळात परीक्षांचे आयोजन करू नये अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकेत असेही म्हटले आहे की या टप्प्यावर थोडे थांबणे विद्यार्थी-पालकांच्या हिताचे आहे, एकदा कोविड - १९ संकटातून आपण बाहेर आल्यावर परीक्षा घ्या आणि लाखो जीवांचे आरोग्य धोक्यात घालण्यापासून वाचवा. एनटीएच्या ३ जुलैच्या परिपत्रकानुसार जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर रोजी तर नीट यूजी २०२० परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. अॅड. अलख आलोक श्रीवास्तव यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत नमूद केलं आहे की, 'एनटीएने जेईई मेन आणि नीट परीक्षांचे सप्टेंबर २०२० मध्ये आयोजन करताना या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे की अनेक राज्यांनी या काळात कोणत्याही व्यावसायिक, बिगर व्यावसायिक परीक्षा घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे जेईई आणि नीट परीक्षा घेणे हे याचिकाकर्ते आणि अशा अन्य विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2E9Cq1H
via IFTTT

Post a Comment

0 Comments