कोविड - १९ विषाणू महामारीचं संकट अद्याप पूर्णपणे संपलेलं नाही. करोनाची दुसरी लाट देशात येणार की नाही याबाबतही सद्यस्थितीत संपूर्ण अनिश्चितता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प. बंगाल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षात दहावी-बारावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम परीक्षेआधी शालेय स्तरावर कोणतीही परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी प. बंगाल मध्ये ३,८७२ नवे करोनाग्रस्त आढळून आले. ४,४३१ जणांना डिस्चार्ज दिला. प. बंगालमध्ये करोनाग्रस्तांची एकूण संख्या ४,१६,९८४ आहे. यापैकी ३२,८३६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत ३,७६,६९६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. एकूण ७,४५२ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. राज्यात शिक्षकांची भरतीही केली जाणार आहे. लवकरच प. बंगाल राज्य सरकार शिक्षकांची १६,५०० रिक्त पदे भरणार आहे. ही भरती प्रक्रिया डिसेंबर आणि जानेवारीत सुरू होईल. महाराष्ट्रात दहावी, बारावी परीक्षा मे महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या यंदाच्या परीक्षा मे २०२१ पूर्वी होणार नाहीत, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. करोना व्हायरस महामारी स्थितीमुळे परीक्षा मे महिन्याच्या आधी होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. सर्वसाधारणपणे बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यात सुरु होते. २०२० मध्येही या परीक्षा नियोजित वेळेतच पार पडल्या होत्या. मात्र दहावीचा केवळ भूगोल विषयाचा पेपर लॉकडाऊनमुळे लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र लॉकडाऊनमुळे पेपर तपासणीला उशीर लागून निकाल विलंबाने लागले. दरम्यान, इयत्ता दहावी, बारावीचे चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे वर्ग करोना महामारी स्थितीमुळे ऑनलाइनच सुरू आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35nQgbH
via IFTTT