मुंबई विद्यापीठातील संशोधनाला आरआरसी कमिटीच्या बैठकीअभावी खीळ

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई विद्यापीठातील संशोधनामध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या रिसर्च रिक्गनेशन कमिटीची (आरआरसी) बैठक वर्षातून एकदाच होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ही बैठक वर्षातून चार वेळा व्हावी, अशी मागणी होऊ लागली आहे. आरआरसी सदस्यांची नियुक्ती युजीसीच्या नियमानुसार होणे बंधनकारक असते. त्यानुसार सदस्य हे पीएचडीचे गाइड असणे आवश्यक आहे. मात्र सदस्य नियुक्तीबाबत सर्वच नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे दिसून येते. पीएचडीच्या प्रस्तावाला मान्यता देणे, गाइडची नियुक्ती, रेफ्रींची निवड, संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रबंधाचे अवलोकन आदी जबाबदाऱ्या आरआरसीवर असतात. मात्र सदस्य प्रशासनाच्या मर्जीतील असल्याने त्यांच्या पात्रतेबाबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. पीएचडीच्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन होणे आवश्यक असते. मात्र समितीची बैठक वर्षातून एकदाच होते. त्याची तारीखही निश्चित नसते. त्यामुळे बैठक तीन महिन्यांतून एकदा झाल्यास विद्यार्थ्यांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र त्याकडे विद्यापीठाकडून दुर्लक्ष होत असल्याची माहिती विद्यापीठाचे अधिसभा सदस्य वैभव थोरात यांनी दिली. त्यामुळे तशा आशयाचे पत्र त्यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना दिले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jSaWOC
via IFTTT

Post a Comment

0 Comments