AICTE चा मोठा निर्णय; इंजिनीअरिंगसाठी बारावीत मॅथ्स, फिजिक्स अनिवार्य नाही

देशातील अभियंत्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल असे एक वादग्रस्त पाऊल अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेने उचलले आहे. बीई आणि बीटेक अभ्यासक्रमाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स हे विषय बारावीत असणे बंधनकारक नाही, असा निर्णय एआयसीटीईने घेतला आहे. एआयसीटीईने बुधवारी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीची हस्तपुस्तिका प्रसिद्ध केली आहे. या हँडबुकमध्ये हा बदल नमूद करण्यात आला आहे. आतापर्यंत इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या यूजी म्हणजेच पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी बारावीत मॅथ्स आणि फिजिक्स हे विषय अनिवार्य होते. २०२१-२२ च्या या हँडबुकमध्ये ने पदवीपूर्व प्रवेशांच्या पात्रता निकषांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमानुसार आता विद्यार्थी बारावीला पुढीलपैकी कोणतेही तीन विषय घेऊन उत्तीर्ण तरी त्यांना इंजिनीअरिंगला प्रवेश मिळू शकेल. हे विषय पुढीलप्रमाणे - फिजिक्स / मॅथेमॅटिक्स / केमिस्ट्री / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / बायोलॉजी / इन्फॉर्मेशन प्रक्टिसेस / बायोटेक्नॉलॉजी / टेक्निकल व्होकेशनल विषय / अग्रीकल्चर / इंजिनीअरिंग ग्राफिक्स / बिझनेस स्टडीज / आंत्रप्रिनरशीप. एआयसीटीईचा हा निर्णय शिक्षणात लवचिकता आणण्याच्या नव्या शिक्षण धोरणाच्या धर्तीवर (NEP 2020) घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वरील नमूद विषयांमध्ये एकत्रित ४५ टक्के गुण (आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के) असणे आवश्यक आहे. एआयसीटीईने यासंदर्भात हँडबुकमध्ये असे म्हटले आहे की 'विद्यापीठांनी मॅथ्स, फिजिक्स, इंजिनीअरिंग ड्रॉइंग यासारखे विद्यार्थ्यांच्या सोयीचे ब्रीज कोर्सेस उपलब्ध करावेत, जेणेकरून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा लाभ घेणे शक्य होईल.' सर्व प्रकारच्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी गणित हा मुलभूत अभ्यासाचा विषय आहे, असं म्हणणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांची एआयसीटीईच्या या निर्णयावर प्रखर टीका होण्याची शक्यता आहे. फार्मसी, आर्किटेक्चर ‘कक्षे’बाहेर दरम्यान, फार्मसी आणि आर्किटेक्चर कॉलेजांना यापुढे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता घ्यावी लागणार नाही. या संस्थांना आता केवळ संबंधित विषयाशी निगडित असलेल्या परिषदांचीच परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे आता या शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. फार्मसी आणि आर्किटेक्चर या विद्याशाखांचे अभ्यासक्रम ठरविण्याची जबाबदारी अनुक्रमे ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’ आणि ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ यांच्यावर आहे. मात्र, कॉलेजांना मान्यता एआयसीटीईची घ्यावी लागत होती. परिणामी प्रशासकीय कामात अनेक अडचणी येत होत्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OPBzs3
via IFTTT

Post a Comment

0 Comments