Also visit www.atgnews.com
लेखीनंतर तोंडी परीक्षा; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा देणे शक्य न झाल्यास त्या परीक्षा लेखी परीक्षेनंतर घेण्यात याव्यात, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. पुन्हा घेण्यात येणाऱ्या या परीक्षांसाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारण्यात येऊ नये, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या भागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र, राज्यभर वाढत असलेला करोनाचा उद्रेक याचबरोबर स्थानिक प्रशासनांकडून येणारी निर्बंध लक्षात घेता या परीक्षांचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला होता. याबाबत राज्य सरकारने अखेर लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा विचार सुरू केला आहे. एप्रिलमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री गायकवाड यांनी राज्यातील पालक संघटनांचे प्रतिनिधी व शिक्षकांची गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर आणि उपसंचालक विकास गरड उपस्थित होते. या बैठकीमध्ये पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी दहावी व बारावीच्या परीक्षांमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या पेपरमध्ये पुरेसे अंतर ठेवावे. प्रश्नसंचासंदर्भातील अडचणी, कंटेन्टमेंट झोन, लॉकडाउन अथवा करोना लागण इत्यादी कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेणे शक्य होणार नाही त्यांच्याबाबत शासनाने विचार करावा. तसेच यासाठी वेगळे शुल्क आकारले जाऊ नये, अशी मागणी पालक संघटनांनी केली. या सूचनांवर करोनामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा वेळापत्रकानुसार देणे शक्य न झाल्यास त्या लेखी परीक्षेनंतर घेण्यात येतील व त्यासाठी वेगळे शुल्क घेऊ नये, अशा सूचना गायकवाड यांनी दिल्या. विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध व्हावेत यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून अथक मेहनत घेण्यात येत असल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याच्या तसेच सह्याद्री वाहिनीवरून होणाऱ्या तासिका वाढवण्याच्या सूचना दिल्या. ऑफलाइन परीक्षेसाठी मोहीम राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राज्यभर समान स्तरावर ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी सज्ज होताना, 'वुई कॅन डू इट ऑफलाइन एक्झाम' ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rEMeEM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments