'आरटीई' प्रवेशांची उर्वरित प्रक्रिया लॉकडाउननंतरच

Admission Update: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत () खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रिया लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यावरच राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांना मुलांच्या प्रवेशांसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. 'आरटीई'च्या प्रवेशप्रक्रियेसाठी राज्यातील खासगी शाळांत नऊ हजार ४३२ शाळांत ९६ हजार ६८४ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी दोन लाख २२ हजार ५८४ अर्ज दाखल झाले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सात एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर केली. त्यात ८२ हजार १२९ मुलांना प्रवेश जाहीर झाले आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांबाबतच्या सूचना 'आरटीई' प्रवेशप्रक्रियेच्या वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे सध्या प्रवेशप्रक्रिया ठप्प आहे. गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाउन सुरू असताना प्रवेशप्रक्रिया राबवली नाही. लॉकडाउन शिथिल झाल्यावर प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या खासगी आस्थापने बंद ठेवण्याचे आणि सरकारी कार्यालयांत १५ टक्के उपस्थितीचे निर्बंध राज्य सरकारने घातले आहेत. त्यामुळे राज्यातील 'आरटीई' प्रवेशप्रक्रिया काही काळ लांबणीवर पडल्याचे स्पष्ट होत आहे. पालकांच्या माहितीसाठी प्रवेशप्रक्रियेबाबत सविस्तर सूचना वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. 'संसर्गामुळे सध्या प्रवेशप्रक्रिया नाहीच' 'संसर्गाची परिस्थिती पाहता सध्या प्रवेशप्रक्रिया राबवणे शक्य नाही. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतरच कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेशप्रक्रिया सुरू होईल,' अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3utmVaa
via IFTTT

Post a Comment

0 Comments