प्रवेशानंतर महिनाभरातच एलएलएमची परीक्षा

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या एलएलएमच्या पाचव्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया १० एप्रिल रोजी सुरू झाली. यानंतर आता १७ मे रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक महिनाही पुरेसा मिळालेला नाही. म्हणून परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या एलएलएमच्या पहिल्या सत्राची परीक्षा १७ मेपासून सुरू होणार आहे. मात्र अजूनही अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया ७ मे रोजी संपेल असे वेबसाइटवर दाखविण्यात येत आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जही भरून घेण्यात आलेले नाहीत. एलएलएम प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी पार पडल्यावर ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरूवात झाली. यंदा प्रवेश परीक्षा लांबली होती. यामुळे प्रवेशही लांबले होते. पाचव्या फेरीची प्रवेश प्रक्रिया १० एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र ही प्रक्रिया कधी संपेल यानंतर सहावी यादी जाहीर होणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. यामुळे प्रवेश न मिळालेले आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यापीठाच्या वेबसाइटवर पाहिले असता अर्ज प्रक्रिया ७ मे रोजी संपेल असे दिसत आहे. असे असले तरी १० एप्रिल रोजी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एका महिन्यानंतर ताबडतोब परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सध्याच्या वेळापत्रकात सलग परीक्षा आहेत. विद्यार्थी आता परीक्षेला सामारे जातीलही. मात्र वेळापत्रक सुधारित करून, प्रत्येक पेपरच्या दरम्यान एक तरी सुट्टी द्यावी, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कुलगुरुंना पत्र लिहले आहे. यावर काय कार्यवाही होते याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Rr1ojA
via IFTTT

Post a Comment

0 Comments