अकरावी प्रवेश: CET साठी विद्यार्थी राजी; ७० टक्के विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यात दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घ्यावी, यासाठी विद्यार्थी सकारात्मक आहेत. शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशी, सुमारे ७० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी सकारात्मक मत नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. करोना साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दहावीचा निकाल कसा जाहीर करायचा, इथपासून ते अकरावीचे प्रवेश कसे करायचे, असे अनेक प्रश्न पालक, विद्यार्थी यांना पडले आहेत. याबाबत सर्व संबंधित घटकांची मते जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशी दोन लाख १४ हजार १६६ विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. यामध्ये ७० टक्के विद्यार्थी अकरावीसाठी प्रवेश परीक्षा देण्यासाठी तयार आहेत, ही बाब समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा, या उद्देशाने ११ मे पर्यंत हे सर्वेक्षण सुरू ठेवण्यात येणार आहे. इयत्ता दहावीसाठी अंतर्गत मूल्यमापन करणे शाळांना शक्य आहे की नाही, याबाबतही शालेय शिक्षण विभागाने शाळेकडून सर्वेक्षण भरून घेतले आहे. यालाही पहिल्या दिवशी १४ हजार ३७९ शाळांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये सुमारे ८६ टक्के शाळांनी अंतर्गत मूल्यमापानाची तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. दहावीची परीक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशाचा मार्ग खडतर होणार आहे. यावर तोडगा म्हणून तज्ज्ञ समितीने प्रवेश परीक्षेचा पर्याय समोर ठेवला आहे. याबचरोबर इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचा पर्यायही समोर येत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने दोन स्वतंत्र सर्वेक्षण हाती घेतली आहेत. पहिल्या दिवशी आलेल्या प्रतिसादानंतर आणखी विद्यार्थी, शिक्षक, पालकांना आपली मते नोंदविता यावी, या उद्देशाने हे सर्वेक्षण ११ मेपर्यंत खुले ठेवण्यात आले आहे. काठिण्यपातळी अधिक हवी दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश कोणत्या आधारावर द्यावा, या प्रश्नावर तज्ज्ञ समितीने प्रवेश परीक्षेचा तोडगा मांडला आहे. मात्र ही परीक्षा केवळ गणित, विज्ञान या विषयांचीच व्हावी, असे मत मांडले जात आहे. पण विद्यार्थ्यांच्या सर्वंकष मूल्यमापनासाठी या परीक्षेत इयत्ता दहावीच्या सर्वच विषयांचा समावेश असणे आवश्यक आहे. तसे झाले, तरच योग्य मूल्यमापन होऊ शकेल, असा आग्रह धरला जात आहे. याचबरोबर परीक्षेची काठीण्य पातळीही थोडी अधिक असावी, अशी तज्ज्ञांची भूमिका आहे. या प्रवेश परीक्षेत एक गुण मिळालेल्यांही प्रवेशाची संधी खुली ठेवावी, याचबरोबर दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाबाबत शाळांची तयारी असल्यास तो पर्याय स्वीकारून त्यानुसार गुणदान करावे व अकरावी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचा पर्याय घ्यावा, असे मतही तज्ज्ञांनी मांडले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ey0nPR
via IFTTT

Post a Comment

0 Comments