Also visit www.atgnews.com
दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळणार का?
म. टा. प्रतिनिधी, पुणे दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांचा समावेश करण्याबाबत अद्याप राज्य माध्यमिक मंडळाकडून कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांना या गुणांना मुकावे लागू नये, अशी मागणी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून केली जात आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल परीक्षेऐवजी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्यात येणार आहे. या मूल्यमापनात क्रीडा गुणांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून क्रीडा गुणांचा अंतर्गत मूल्यमापनामध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. शिक्षण विभागानेही यासंदर्भात माध्यमिक मंडळाकडे पत्रव्यवहार केला असून, माध्यमिक मंडळाने क्रीडा गुणांचा अंतर्गत मूल्यमापनात समावेश करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. करोनामुळे गेल्या वर्षी कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा झालेल्या नाहीत. दहावीतील विद्यार्थ्यांनी जर आठवी आणि नववीत असताना स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असेल तर त्या स्पर्धांमधील कामगिरीद्वारे यावर्षी विद्यार्थ्यांना गुण देणे अपेक्षित असल्याचे शिक्षक संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सहावीपासून जिल्हास्तरीय आणि इतर क्रीडा स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धांमधील सहभाग आणि स्पर्धेतील यशासाठी गुण दिले जातात. त्यामध्ये सहावी, सातवीतील जिल्हास्तरावरील सहभागासाठी पाच गुण, राज्य पातळीवर दहा गुण, राष्ट्रीय पातळीवर सहभागासाठी दहा आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी १५ गुण दिले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी खेळला, तर त्याला २० ते २५ गुण दिले जातात. या गुणांमुळे हजारो विद्यार्थ्यांना दर वर्षी दिलासा मिळतो. यंदा केवळ स्पर्धा रद्द झाल्या म्हणून या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, असे क्रीडा शिक्षकांकडून सांगितले जात आहे. सरकारने विद्यार्थ्यांनी दहावीपूर्वी खेळलेल्या स्पर्धांमधील कामगिरी लक्षात घेऊन गुणांकनात क्रीडा गुणांचा समावेश करावा, या मागणीने आता जोर धरला आहे. कला प्रकारांचे गुण मिळायला अडचण नाही क्रीडा प्रमाणेच २०१७ पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय; तसेच लोककलांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठीही गुण मिळतात. या गुणांबाबत माध्यमिक मंडळाने यापूर्वीच पत्रव्यवहार केला असून, दहावीपूर्वी विद्यार्थ्यांनी ज्या कला परीक्षा दिल्या आहेत, त्याचे गुण अंतर्गत मूल्यमापनात समाविष्ट केले जाणार आहेत. त्या गुणांबाबतीत कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ro1xEL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments