सेतू अभ्यासक्रमाला सुरुवात; मागील इयत्तेचा पाया पक्का होणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाकाळात मागील शैक्षणिक वर्षात संपूर्ण शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने पार पडले. यामुळे अनेकांना पद्धतशीर शिक्षण मिळू शकले नाही तर, काहींना ऑनलाइनची सुविधा नसल्याने शिक्षण घेता आले नाही. या तक्रारी विचारात घेऊन या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा मागील इयत्तेचा पाया पक्का व्हावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज, सोमवारी याचे अनावरण होणार आहे. करोनाच्या संकटामुळे मागील शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण पार पडले. ऑनलाइन शिक्षणात अनेकांकडे तांत्रिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. तर अनेक जणांना ऑनलाइन शिक्षण मिळू शकले नाही. यातच सद्यस्थितीमध्ये परीक्षा घेणे शक्य नसल्याने यंदाही विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा मागील इयत्तेचा पाया पक्का व्हावा, या उद्देशाने सेतू अभ्यासक्रम देण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने याची निर्मिती केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पहिले ४० दिवस मागील इयत्तेचे शिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कार्यपुस्तिका किंवा अन्य माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. शिक्षकांनी वैयक्तिक स्तरावर केलेल्या तसेच राज्य सरकारने विविध स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात याचबरोबर लॅन्सेटसारख्या संस्थेने मांडलेल्या अभ्यासात सेतू अभ्यासक्रमाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. याचाच आधार घेत राज्य सरकारतर्फे हे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शिक्षकांना मार्गदर्शन आज या उपक्रमाचे ऑनलाइन अनावरण होणार असून यावेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी हेही उपस्थित असणार आहेत. या संपूर्ण उपक्रमात शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व इतर पर्यवेक्षीय यंत्रणा तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे या सर्वांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hgfjlV
via IFTTT

Post a Comment

0 Comments