Also visit www.atgnews.com
दहावीच्या मूल्यांकन पद्धतीवर आक्षेप कायम
म. टा. प्रतिनिधी, पुणे दहावीच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या पद्धतीबाबत आक्षेप अजूनही कायम असून, याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल. बारावीच्या मूल्यांकनाबाबत योग्य आणि पारदर्शी पद्धत न अवलंबल्यास न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला असल्याची माहिती याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, याचिका फेटाळली नसून, न्यायालयाच्या सूचनेनुसार पुन्हा याचिका दाखल करता येईल, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्य मंडळाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अशैक्षणिक आणि शैक्षणिक गुणवत्तेला घातक असल्याचे सांगत कुलकर्णी यांनी निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान दिले. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाल्यानंतर, प्रसारमाध्यमांमध्ये याचिका फेटाळल्याची चुकीची माहिती देण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. कुलकर्णी म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयात दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी तीन मुद्द्यांवर याचिका दाखल केल्यानंतर, सरकारने २८ मे रोजी शासन निर्णय काढला. त्यामध्ये दहावीची परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या; तसेच अंतर्गत मूल्यांकनाबाबत जाहीर होणाऱ्या निकालाबाबत समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबत नमूद करण्यात आले. यासोबतच अकरावी प्रवेशासाठी सीईटीच्या गुणांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अशाप्रकारे गुणवत्तेला प्राधान्य देण्यात आले आहे, तर मूल्यांकनाच्या आधारावर प्रवेशाला कमी महत्त्व दिले आहे. अशा प्रकारे या दोन प्रमुख मुद्द्यांबाबत समाधानकारक भूमिका असल्याने, याचिका मागे घेण्यात आली. मात्र, दहावीचा निकाल हा इयत्ता नववी आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकनाबाबत जाहीर करणे, हे पूर्णपणे अशैक्षणिक आणि शिक्षण व्यवस्थेत वाईट प्रवृत्तींना खतपाणी घालण्यासारखे आहे. त्यामुळे या तिसऱ्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात लढा सुरू राहील. येत्या दोन ते तीन दिवसांत याबाबत याचिका दाखल करण्यात येईल. सरकारने असाच घोळ बारावीच्या मूल्यांकनाबाबत केल्यास, न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. . दोन बेंचपुढे सुनावणी झाली या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या दोन बेंचपुढे सुनावणी झाली. त्यामुळे निकाल पूर्णपणे आमच्या बाजूने लागला नाही, अशी शक्यता आहे. गेली चाळीस वर्षे शिक्षण क्षेत्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सिनेट सदस्य अशा अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. याबाबत सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र, माझ्याबाबत विचारणा होत असल्याने स्पष्टीकरण देतोय, कुलकर्णी यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2S8XXif
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments