Also visit www.atgnews.com
पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या निम्म्या जागा रिक्त
पुणे : 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या ५५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागांसाठी मंजूर असलेल्या एकूण ३८६ पदांपैकी केवळ १७६ पदे भरण्यात आली आहेत. यामुळे काही विभाग केवळ एका प्राध्यापकाच्या जीवावर चालवण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. प्राध्यापकांवरील ताण कमी करण्यासाठी आणि विद्यापीठातील विभाग सुरू राहावेत, यासाठी विद्यापीठाला त्यांच्या निधीतून काही प्राध्यापकांची नेमणूक करावी लागली असून त्यांच्या वेतनासाठी दर वर्षी सुमारे ३.५ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च विद्यापीठाला करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून प्राध्यापक भरती बंद करण्यात आली आहे. परिणामी, विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यावर तोडगा म्हणून विद्यापीठाने सुमारे १०० प्राध्यापकांची कंत्राटी पद्धतीने आणि विद्यापीठाच्या निधीच्या आधारे नेमणूक केली आहे. हीच परिस्थिती आणखी काही वर्षे सुरू राहिली; तर विद्यापीठाच्या तिजोरीवर त्याचा मोठा ताण येणार असून विद्यापीठाच्या ठेवींना ओहोटी लागण्याची शक्यता आहे. विभाग अडचणीत येण्याची शक्यता विद्यापीठांच्या काही विभागांचा विचार केला; तर रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहायक ग्रंथपाल अशी एकूण ४२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. परंतु, यापैकी केवळ २० जागा भरण्यात आल्या असून, २२ जागा रिक्त आहेत. भौतिकशास्त्र (फिजिक्स) विभागात ४० पदे मंजूर असून, त्यापैकी १५ पदे भरण्यात आली आहेत. या विभागात २५ पदे रिक्त आहेत. मराठी, इतिहास, इंग्रजी, संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स), परकीय भाषा, प्राणिशास्त्र या विभागांमध्ये ७० ते ७५ टक्के पदे रिक्त आहेत. या विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या प्राध्यापकांची संख्याही कमीच असल्याने हे विभाग भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे. विद्यापीठातील विभागनिहाय रिक्त पदे विभाग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे रसायनशास्त्र ४२ २० २२ भौतिकशास्त्र ४० १५ २५ इंग्रजी ०८ ०२ ०६ परकीय भाषा १४ ०४ १० इतिहास ०८ ०२ ०६ गणित १४ ०७ ०७ पाली १५ ०५ १० संख्याशास्त्र २० ०७ १३ प्राणिशास्त्र १८ ०८ १० वेळीच पावले टाका राज्यातील विद्यापीठांनी, प्राध्यापकांच्या संघटनांनी आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी प्राध्यापक भरतीला मंजुरी द्यावी, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे वारंवार केली आहे. प्राध्यापक भरतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, एवढ्या आश्वासनापलीकडे पुढे काहीच घडत नाही. त्यामुळे केवळ राज्यातच नाही; तर देशात कायमच अग्रस्थानी असलेल्या विद्यापीठातच मंजूर पदांपैकी निम्मी पदे रिक्त असल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा तुटपुंज्या मनुष्यबळावर विद्यापीठाने सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा मात्र कायम केली जाते. सरकारच्या तिजोरीवर सध्या ताण असला, तरी यापैकी अत्यंत गरजेची अशी काही पदे भरण्यासाठी आता कालबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे. पुढील काही वर्षांत रिक्त पदांची संख्या अशीच वाढत राहिल्यास विद्यापीठाचा दर्जा खालावू शकतो आणि त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच ही कमतरता दूर करण्यासाठी पावले टाकली जावीत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/315v6j3
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments