उर्वरित परीक्षांबाबत सीबीएसईने कोर्टाला काय सांगितले...वाचा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात दहावी, बारावीच्या उर्वरित परीक्षांबाबत कोणता निर्णय घेणार ते गुरुवारी कळणार आहे. सीबीएसई बोर्ड गुरुवारी २५ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाला यासंदर्भातील माहिती देणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय या उर्वरित परीक्षांबाबतचे निर्देश देईल. महाधिवक्ता तुषार मेहता यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 'परीक्षांसंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. बुधवारी २४ जून रोजी सायंकाळपर्यंत निर्णय घेण्यात येईल.' सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या प्रलंबित विषयांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार १ ते १५ जुलै २०२० या कालावधी होणार आहेत. मात्र पालक, विद्यार्थ्यांचा सीबीएसईच्या या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. करोना महामारीमुळे परिस्थिती आरोग्यदृष्ट्या परीक्षा देण्यास योग्य नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. परिणामी सर्वोच्च न्यायलायाने बोर्डाला परीक्षांबाबत पुनर्विचार करण्यास सांगितले होते. मंगळवारपर्यंत बोर्डाने आपला निर्णय सर्वोच्च न्यायालयाला कळवायचा होता. मात्र चर्चा अद्याप अंतिम निर्णयाप्रत यायची आहे. त्यामुळे आणखी एक दिवसाचा वेळ महाधिवक्ता तुषार मेहता यांनी कोर्टाकडे मागितला. त्यामुळे ही घोषणा आता २५ जूनवर गेली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या परीक्षा होऊ नयेत अशी विद्यार्थी-पालकांची भूमिका आहे. सुनावणीच्या वेळी न्यायालयाने सीबीएसईला परीक्षांसदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने देखील या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. दहावी आणि बारावी परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी कोणत्या उपाययोजना करणार त्याचा तपशीलही बोर्डाने सीबीएसई कोर्टापुढे मांडावा असे कोर्टाने सुनावणी दरम्यान सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hSFHl8
via IFTTT

Post a Comment

0 Comments