महाराष्ट्रात पदवी परीक्षा घेणे शक्य नाही; उच्च शिक्षणमंत्र्यांचा पुनरुच्चार

Final Year Exams 2020: राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना कुलगुरुंशी चर्चा केली नाही, हा वारंवार होणारा आरोप राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावला. शिवाय राज्य शासनाची भूमिका प्रामाणिक आणि विद्यार्थीहिताची आहे. राज्यातील कोविड - १९ ची परिस्थिती पाहता सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं शक्य नाही हे आम्ही केंद्र सरकारला कळवलेलं आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. येत्या दोन ते तीन दिवस वाट पाहणार यूजीसीकडून काही प्रतिसाद येतोय का, असंही सामंत यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यातील विद्यापीठांतील एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना देखील पदवीच्या विद्यार्थ्यांचा फॉर्म्युला लावून त्यानुसार मूल्यांकन करा अशी शिफारस कुलगुरुंच्या समितीने दिली आहे, हे देखील सामंत यांनी स्पष्ट केलं. '२९ एप्रिलच्याच गाइडलाइनमध्ये स्पष्ट लिहिलं असतं की परीक्षा घ्यायच्याच आहेत, तर तेव्हापासून तशी आम्ही तयारीही केली असती आणि विद्यार्थ्यांचीही मानसिकता झाली असती. मात्र तेव्हा तसे यूजीसीने काही स्पष्ट केले नाही. आमच्या १७ मे रोजीच्या पत्राला उत्तर दिले नाही आणि महिनाभरानंतर गाइडलाइन्स काढल्या,' असं सामंत म्हणाले. राज्यातील विविध १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत परीक्षा आयोजनाबाबत असमर्थता दर्शवली. या बैठकांचे रेकॉर्डिंग सामंत यांनी पत्रकारांना ऐकवले. राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत मांडलेले मुद्दे अन्य कुलगुरुंच्या भूमिका सामंत यांनी प्रसारमाध्यमांसमोर ठेवल्या. उदय सामंत म्हणाले, '२९ एप्रिलला यूजीसीच्या गाईडलाइन्स मध्ये स्पष्ट केलं होतं की प्रत्येक राज्यातील कोविड - १९ च्या परिस्थितीनुसार तेथील राज्याने आणि विद्यापीठाने निर्णय घ्यायचे आहेत. २ मे रोजी सर्व १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक झाली. कुलगुरूंच्या समितीचा अहवाल ६ मे रोजी राज्य सरकारला दिला. ८ मे रोजी कुलगुरुंच्या समितीच्या शिफारसी शासनाने स्वीकारल्या. १७ मे रोजी मी स्वत: यूजीसीला पत्र लिहिलं होतं. त्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची परवानगी मागितली होती.' सामंत पुढे म्हणाले, '२५ मे आणि २९ मे रोजी कुलगुरुंच्या बैठका झाल्या. तसेच ३० मे रोजी उद्धव ठाकरे यांनी कुलगुरुंशी चर्चा केली. मी स्वत: सर्व संबंधित शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा केली. १८ जूनला आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. तेव्हा असा निर्णय झाला की कोविड - १९ ची स्थिती पाहता व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करायच्या. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिखर संस्थांकडे परवानगी मागायची. तशी पत्रंही शिखर परिषदेला पाठवली.' 'यूजीसी येत्या दोन ते तीन दिवसात माझ्या पत्राला काही प्रतिसाद देते का याची वाट पाहणार आहे,' असं सामंत यांनी सांगितलं.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZUQSl5
via IFTTT

Post a Comment

0 Comments