परीक्षा घ्यायच्याच असे UGC चे म्हणणे असेल, तर SOP द्या : उदय सामंत

महाराष्ट्रातील कोविड - १९ परिस्थिती पाहता पदवी परीक्षा घेणे शक्य नाही. विद्यापीठांनी परीक्षा घेतल्याच पाहिजेत असे विद्यापीठ अनुदान आयोगाने बंधनकारक केले तर त्यांनी परीक्षा कशा घ्याव्यात त्याचे (स्टॅंडिग ऑपरेटिंग प्रोसिजर) द्यावे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगतिले. दरम्यान गुरुवारी दुपारी याबाबतची राज्याची भूमिका अधिक स्पष्ट करण्यासाठी ते पत्रकार परिषद घेणार आहेत. यूजीसीने परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यापीठांना दिलेले निर्देश बंधनकारक आहेत का, परीक्षा घ्याव्याच लागल्या तर राज्याचे पुढील धोरण काय असेल असे प्रश्न सामंत यांना बुधवारी वृत्तवाहिन्यांनी विचारले. त्यावर ते म्हणाले, 'मार्गदर्शक तत्वे ही मार्ग दाखवणारी असतात. यूजीसीला वाटत असेल की परीक्षा व्हायलाच हव्यात तर त्या कशा घेतल्या गेल्या पाहिजेत याचेही निर्देश म्हणजेच SOP यूजीसीने द्यावे. कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेला कसे यायचे, एक वर्गात किती विद्यार्थी बसले पाहिजेत, पेपर छपाई कशी व्हायला पाहिजे, शिक्षकांनी पेपर कसे तपासायचे या सगळ्याबद्दलचे नियम यूजीसीने घालून द्यावेत.' यूजीसीने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यापूर्वी राज्यांशी चर्चा करायला हवी होती. महाराष्ट्रासह अन्य नऊ राज्यांनी परीक्षांसंदर्भात हीच भूमिका घेतली आहे. परीक्षा घेणे हे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि अन्य संबंधित या सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नाही, या भूमिकेवर राज्य सरकार आजही ठाम आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31XIUdR
via IFTTT

Post a Comment

0 Comments