देशातील शाळा टप्प्याटप्प्याने 'अशा' उघडणार!

Reopening of schools: केंद्र सरकारने शाळा उघडण्याबाबतची योजना तयार केली आहे. यानुसार देशातील शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्था येत्या १ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहेत. मात्र अंतिम निर्णय त्या त्या राज्य सरकारांनी तेथील परिस्थितीनुसार घ्यावयाचा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. यात कोविड-१९ परिस्थिती आणि व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. विविध मंत्री तसेच सचिव या बैठकीस उपस्थित होते. या महिन्या अखेरीस अनलॉकसंबंधी पुढील मार्गदर्शक तत्वे राज्यांना जारी केली जातील, त्यानुसार शाळा पुन्हा उघडण्याचा निर्णय राज्यांनी त्यांच्या अखत्यारित घ्यावयाचा आहे. शाळा आणि शैक्षणिक संस्थांना विस्तृत पद्धतीत स्टॅँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरबाबत मार्गदर्शन केले जाईल. शालेय विभागाने जुलैमध्ये एक सर्वेक्षण केले आहे. अर्थात या सर्वेक्षणानुसार पालक मुलांना कोविड स्थितीत शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचेच निरीक्षण पुढे आले आहे, मात्र राज्य सरकारांनी केंद्राला आर्थिक वंचित गटातील विद्यार्थी या लॉकडाऊनमुळे शिक्षणापासूनही वंचित राहात असल्याचे सांगितले आहे. बैठकीस उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, 'जेथे करोनाचे रुग्ण कमी आहेत त्या राज्यांनी मोठ्या विद्यार्थ्याचे वर्ग सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे.' दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, टप्प्याटप्प्याने शाळा उघडण्याची शिफारस करण्यात आली आहे. पहिल्या १५ दिवसांसाठी दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जातील. विविध तुकड्यांना विविध दिवशी शाळेत हजेरी लावण्यास सांगितले जाईल. एका शाळेत समजा जर दहावीच्या चार तुकड्या असतील तर दोन तुकड्यांचे विद्यार्थी एका दिवशी, उर्वरित तुकड्यांचे दुसऱ्या दिवशी शाळेत येतील. शाळेचे तासही ५-६ वरून कमी करून २ ते ३ तास करण्यात येतील. सर्व शाळा सकाळी ८ ते ११ आणि दुपारी १२ ते ३ अशा दोन सत्रात भरवल्या जाण्याची शक्यता आहे. मधला एक तास सॅनिटायझेशनसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. शाळांना ३३ टक्के उपस्थितीने कार्यरत राहण्याची शिफारस करण्यात येणार आहे. बैठकीतील चर्चेनुसार असे पुढे येत आहे की सरकार पूर्व प्राथमिक किंवा प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या शाळा भरवणार नाही. १० वी ते १२ वीचे भरायला सुरुवात झाल्यानंतर अशाच प्रकारे सहावी ते नववीचे वर्ग भरवण्यात येतील. स्वित्झर्लंडमधील शाळा जशा पद्धतीने सुरक्षिततेसह उघडण्यात आल्या तीच पद्धती येथे वापरण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतात उत्तरेकडी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड सारखी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश शाळा उघडण्याच्या स्थितीत आहेत. राज्य सरकारने कोविड स्थिती आणि शाळा व्यवस्थापन तसेच पालकांचा सल्ला घेऊन त्यानुसार निर्णय घ्यायचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kUPwAw
via IFTTT

Post a Comment

0 Comments