शाळा कधी उघडणार? केंद्र सरकारने सांगितले...

केंद्र सरकारने बुधवारी अनलॉक - ५ अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेससाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. नव्या गाईडलाइन्सनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने येत्या १५ ऑक्टोबरपासून शाळा-महाविद्यालये उघडण्याची सशर्त परवानगी दिली आहे. म्हणजेच त्या-त्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी १५ ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याबाबत निर्णय घ्यावयाचा आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार काही राज्यांमध्ये हे वर्ग सुरूही झाले आहेत. राज्यांनी तेथील कोविड-१९ परिस्थितीनुसार, शाळा, कोचिंग क्लासेस उघडण्याचा निर्णय घ्यायचा आहे. मात्र, ही परवानगी देतानाच केंद्र सरकारने ऑनलाइन शिक्षण सुरूच राहील, उलट त्यास अधिक प्रोत्साहन दिले जाईल असे आवर्जून नमूद केले आहे. पालकांची परवानगी आवश्यक विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे असेल तर शाळांना त्यांच्या पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तशी लेखी परवानगी असेल तरच ती मुलं शाळेत येऊ शकतील. शाळा पालकांवर त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची जबरदस्ती करू शकत नाहीत, असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. विद्यार्थी-शिक्षकांसाठी आरोग्यविषयक सर्व ती खबरदारी शाळांनी घ्यायची आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी जारी केलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचं पालन करायचं आहे. ज्या शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत आणि त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी शाळेत शारीरिक दृष्ट्या उपस्थित राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण घेऊ इच्छित आहे त्यांना यासाठी परवानगी दिली जाईल. महाराष्ट्रात काय स्थिती? राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक करोना बाधित रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या सातत्याने वाढत चालली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे असल्याने चिंता कायम आहे. परिणामी, राज्यात शाळा, कॉलेज, अन्य शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्लासेस तूर्त बंदच राहतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळा, कॉलेजे, कोचिंग क्लासेल ऑक्टोबरमध्ये सुरू होणार नाहीत हे स्पष्ट आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यासंदर्भातील स्थितीची चाचपणी करण्यात येईल, अशी माहिती दिली होती. त्यातही दहावी, बारावीच्या वर्गांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jwMi5v
via IFTTT

Post a Comment

0 Comments