Also visit www.atgnews.com
पदवी प्रमाणपत्राअभावी हजारो विद्यार्थी IBPS परीक्षेला मुकणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा लांबल्याचा फटका 'आयबीपीएस'च्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना बसला असून, अर्ज करण्यासाठी पदवी अभ्यासक्रमाची अंतिम वर्षाची म्हणजे पदवीची गुणपत्रिका अनिवार्य करण्यात आली आहे. आयबीपीएसद्वारे गुणपत्रिका जमा करण्यासाठी आज बुधवार २३ सप्टेंबर ही अंतिम मुदत दिल्याने राज्यातील अनेक स्थानिक विद्यार्थ्यांना अर्जच करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील १७ राष्ट्रीयकृत बँकांमधील दोन हजार ५५७ क्लार्क भरतीसाठी आयबीपीएस या केंद्रीय संस्थेमार्फत डिसेंबर महिन्यात पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची जानेवारी २०२१ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, या परीक्षेला अर्ज करण्यासाठी; तसेच कागदपत्रांची पूर्तता व पडताळणी करण्याची अंतिम मुदत २३ सप्टेंबर दिली आहे. अर्ज करतांना पात्र करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पदवीच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका २३ सप्टेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्यात पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अजून परीक्षाच झाल्या नाही. त्यामुळे निकाल जाहीर होण्याचा प्रश्नच नाही. साधारण ८ लाख विद्यार्थी अंतिम वर्षाला आहे. या सर्व परिस्थितीचा फटका परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना बसला आहे. या वर्षी पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देत असलेले विद्यार्थी या परीक्षेला व अर्थात नोकरीच्या संधीला मुकणार आहेत. करोनामुळे आधीच नोकरीच्या संधी घटल्या असल्याने या विद्यार्थ्यांना मोठे नुकसान होणार आहे. या परीक्षेची तयारी विद्यार्थी दोन ते तीन वर्षे करतात. त्यामुळे या संधीपासून त्यांना वंचित राहावे लागणे हे दुर्दैवी आहे, असे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले आहे. अट शिथिल करावी व अर्जाला मुदतवाढ मिळावी आयबीपीएसने पदवी परीक्षा २३ सप्टेंबरपूर्वी उत्तीर्ण करण्याची अट शिथिल करावी; तसेच पदवी परीक्षा उत्तीर्ण करण्याची अट ३० नोव्हेंबरपर्यत वाढवावी. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची मुदत १५ दिवसांनी वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे. सरकार आयबीपीएसकडे पाठपुरावा करणार का ? करोनाच्या प्रादुर्भावामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द व्हाव्यात; तसेच त्या पुढे ढकलाव्या अशा प्रकारच्या मागण्या करणाऱ्या विद्यार्थी संघटना आता याच विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंतिम वर्षातील अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही, ही परीक्षा देता येणार नाही. यातील अनेक विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधी प्राप्त होऊन ऑनलाइन किंवा सोप्या पद्धतीने परीक्षा घेऊन, निकाल जाहीर केल्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता राज्य सरकारने तातडीने पावले उचलून आयबीपीएसकडे पाठपुरावा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32RAynY
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments