Also visit www.atgnews.com
यंदा दहावीच्या परीक्षेला 'या' पालकांचा फाटा? काय आहेत कारणे?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई परीक्षा शुल्क भरण्यास पैसे नाहीत...ऑनलाइन शिक्षणासाठी डेटाकार्ड नाही...वर्षभर मुलाने अभ्यासच केला नाही...अशा विविध संकट-समस्यांच्या जाळ्यात अडकलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी व पालकांनी दहावी व बारावीच्या परीक्षांपासूनच लांब राहण्याचा निर्धार केला आहे. परीक्षेला बसवून नापासचा शिक्का मारून घेण्यापेक्षा यंदा परीक्षा देणार नाही, असा निर्णय शहरातील काही पालकांकडून शाळेच्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवला जात आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबांतील काही विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेपासून लांब राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घाटकोपर, धारावी, बोरिवली परिसरातील झोपडपट्टी भागातील दहावी व बारावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक पालकांनी याबाबत शाळांना कळविले आहे. या विद्यार्थी-पालकांचे मन परीक्षा देण्यासाठी वळवण्यासाठी मुख्याध्यापकांचे प्रयत्न सुरू आहेत. करोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. तर अनेकजण गावीच आहेत. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या ऑनलाइन वर्गालाही उपस्थिती लावता आली नाही. यामुळे परीक्षा देऊन अनुत्तीर्ण होण्यापेक्षा परीक्षेस न बसण्याचा पर्याय स्वीकारला जात आहे. दहावी, बारावीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शाळांमधून विद्यार्थ्यांना फोन केले जात आहेत. यावेळी काही पालक अर्ज भरण्यास नकार देत असल्याचे घाटकोपर येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. तर काही विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे. वर्गात उपस्थितीही लावली. मात्र परीक्षा नेमकी कशी होणार, प्रवेश परीक्षांचे काय, याबाबत अनिश्चितता असल्याने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांवर परिणाम होऊ शकतो. या गुणांवर अनेकांचे करिअर अवलंबून असते. यामुळे गोंधळात परीक्षा देण्यापेक्षा एक वर्ष 'ड्रॉप' घेऊन पुढील वर्षी बोर्डाची परीक्षा देण्याचा विचार अनेक विद्यार्थी करत असल्याचे बोरिवलीतील शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. यामुळे यंदा दहावी व बारावीला पटावर जेवढे विद्यार्थी आहेत, तेवढे सर्वच परीक्षा देतील, अशी अपेक्षा मुख्याध्यापकांनी सोडली आहे. १७ नंबर अर्जालाही अल्प प्रतिसाद शाळेत न जाता बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरावा लागतो. हा अर्ज भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही यंदा कमी आहे. सध्या ही प्रक्रिया सुरू असून, ज्या शाळांमध्ये १७ नंबरचे केंद्र आहे, अशा शाळांमध्ये नोंदणी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अवघे ४० टक्केच असल्याचे एका मुख्याध्यापकांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2W9Lolh
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments