आरोग्य पदभरती आता परीक्षेद्वारेच; हजारो विद्यार्थ्यांना दिलासा

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्याच्या आरोग्य विभागातील पदभरती महिन्याच्या आत परीक्षा घेऊन होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी पदभरती ही दहावी, बारावीच्या गुणांवर होणार होती. त्याविरोधात शेकडो विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्य सरकारने आरोग्य विभागातील १७ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया गुणवत्तेनुसार (दहावी, बारावी, पदवीच्या गुणांवर); तसेच मुलाखतीद्वारे राबविल्यास राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य उमेदवारांना संधीच मिळणार नसल्याचे समोर आले होते. दहावीच्या 'बेस्ट ऑफ फाइव्ह' निकालामुळे आणि बारावीच्या वाढलेल्या गुणांमुळे अनेक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मागे पडणार आहेत. त्यामुळे या भरतीला स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध झाला होता. ही भरती परीक्षा घेऊनच पार पडली पाहिजे, या पदांसाठी विद्यार्थी तीन ते पाच वर्षांपासून तयारी करीत आहे, भरती प्रक्रियेत दहावी आणि बारावीच्या गुणांचा विचार केल्यास खूप कमी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मात्र, ही भरती परीक्षा घेऊनच पार पडली पाहिजे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. त्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स'ने संपूर्ण प्रकाराबाबत वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी टोपे यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या भावना पोहोचवल्या. त्यासोबतच निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. अखेर विधिमंडळ अधिवेशनात टोपे यांनी या भरतीबाबत सभागृहाला माहिती दिली. 'करोनामुळे लॉकडाउनची परिस्थिती असल्याने पदभरती मेरिटनुसार घेण्याचा विचार होता. मात्र, आता राज्यात सर्व क्षेत्र खुले होत असल्याने, एकूण पदभरतीच्या पन्नास टक्के जागा एका महिन्याच्या आत परीक्षा घेऊन भरणार आहे. रोस्टर तयार करण्यासाठी आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी जाईल. त्यानंतर पदभरती प्रक्रियेला त्वरित सुरुवात होईल,' अशी माहिती टोपे यांनी दिली. हेही वाचा: मेरिटनुसार पदभरती का नको ? राज्यात दहावीची परीक्षा मार्च २०१०पूर्वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेतील पूर्ण सहा विषयांचे गुण ग्राह्य धरण्यात येतात. त्यानंतरच्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे 'बेस्ट ऑफ फाइव्ह'नुसार म्हणजेच एकूण विषयांपैकी पाच विषयांमध्ये मिळालेल्या चांगल्या गुणांच्या आधारे एकूण गुण जाहीर होतात. त्यामुळे नोकरीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणांमध्ये तफावत निर्माण होते. या तफावतीत सर्वाधिक नुकसान २०१०पूर्वी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणार आहे. त्याचप्रमाणे बारावीच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल केल्याने अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे सरळसेवा पदभरतीत किंवा आरोग्य विभागाच्या पदभरतीत दहावीच्या गुणांचा विचार केल्यावर, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जुने विद्यार्थी मागे पडून त्यांचा दहावी व बारावीच्या गुणांचा टिकाव लागणार नाही. त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता नाही. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ao0dcm
via IFTTT

Post a Comment

0 Comments