चुकीच्या क्लिकमुळे प्रवेश हुकलेल्या विद्यार्थ्याला कोर्टाचा दिलासा

IIT Mumbai : केवळ एका चुकीच्या क्लिकमुळे आयआयटी मुंबईतला इंजिनीअरिंगचा प्रवेश गमावण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्याला इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाला अंतरिम प्रवेश देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. आग्रा येथील निवासी असलेला सिद्धार्थ बात्रा याने आयआयटी मुंबईतील चार वर्षीय कालावधीच्या इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाची जागा गमावली होती. कारण त्याने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत चुकून चुकीचा पर्याय निवडला होता. न्या. संजय किशन कौल, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. ऋषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. विद्यार्थ्याच्या वतीने प्रल्हाद परांजपे यांनी बाजू मांडली. या विद्यार्थ्याला अंतरिम प्रवेश द्यावा, असे निर्देश खंडपीठाने आयआयटी मुंबईला दिले. यासंदर्भातील आपले म्हणणे मांडण्यासाठी कोर्टाने आयआयटी मुंबईला वेळ दिला. या प्रकरणी आता शीतकालीन सुट्टीनंतर सुनावणी होणार आहे. नेमकं प्रकरण काय? सिद्धार्थ बात्रा याने जेईईत त्याने २७० वा रँक पटकावला आणि आयआयटी मुंबईत इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी. टेक. साठी त्याला प्रवेश मिळाला, पण तो काहीच दिवसात रद्द झाला. त्याला पहिल्या फेरीत १८ ऑक्टोबर रोजी आयआयटी मुंबईत प्रवेश मिळाला. पण ३१ ऑक्टोबर रोजी त्याने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेळी चुकून 'withdraw from seat allocation and further rounds' या लिंकवर क्लिक केलं. परिणामी १० नोव्हेंबरपासून त्याचं नाव प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीतून वगळलेलं दिसलं. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगसाठी ९३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. आयआयटीने उत्तर दिले की नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी आयआयटी बांधील आहे. २३ नोव्हेंबरला बात्राची याचिकी फेटाळण्यात आली. त्यानंतर बात्रा याने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oBFhCf
via IFTTT

Post a Comment

0 Comments