प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय नाही: वर्षा गायकवाड

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्यात सुरू झालेल्या शाळांमधील विद्यार्थी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत शैक्षणिक नुकसान होणार नाही, या संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञांशी विचार विनिमय सुरू आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा काहीशा उशिरा म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसारच राज्यातील इतर जिल्ह्यांतील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल, असे गायकवाड यांनी सांगितले. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याबाबतचा विचार करता येईल. लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे सहज शक्य नसल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नाही. तसेच कोणताही निर्णय झालेला नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा व आरोग्य विषयक बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी माहिती गायकवाड यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37MNKvS
via IFTTT

Post a Comment

0 Comments