Also visit www.atgnews.com
दहावीची परीक्षा ऑनलाइन? वाढत्याकरोना प्रादुर्भावामुळे चर्चांना उधाण
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, शालेय विद्यार्थ्यांनाही आता करोनाची लागण होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयता दहावी व बारावीच्या परीक्षा कशा होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या परीक्षा ऑनलाइन घेण्यास पालक आणि संघटनांची पसंती असली, तरी तज्ज्ञांचा विरोधाचा सूर आहे. राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने गेल्या आठवड्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत, तर इयत्ता दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. करोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले. दिवाळीनंतर राज्यात करोनाचा कमी प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणी इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर दीड महिन्याने काही जिल्ह्यांत इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, मुंबई आणि परिसरातील शाळा अजूनही बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू असले, तरी ग्रामीण भागात त्यास मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यास पूर्ण झालेला नाही. आता परीक्षा जवळ आल्या असताना, अनेक ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना करोनाची लागण होत आहे. अशा परिस्थितीत अनेक जिल्ह्यांत २८ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. या सर्वांचा परिणाम इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यावर होत असल्याचे चित्र आहे. मुलांच्या सुरक्षेच्या कारणामुळे पालकांकडून ऑनलाइन परीक्षेला पसंती देण्यात येत आहे. मात्र, दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३१ लाख इतकी आहे. अशा परिस्थितीत लॅपटॉप, कम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात अडचणी आहेत. त्यातच इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या ग्रामीण भागात आहे. सध्या शहरी भागातही इंटरनेटचा वेग मंदावल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन परीक्षा तांत्रिक अडचणीची व गैरसोयीचे ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 'ऑनलाइन'साठी चाचपणी शक्य' राज्यात विद्यापीठांच्या ऑनलाइन परीक्षेप्रमाणे राज्य मंडळाची दहावी व बारावीची परीक्षा होऊ शकते. या परीक्षा घेण्यासाठी सरकारी यंत्रणांची मदत होऊ शकते. त्या माध्यमातून सॉफ्टवेअर तयार करून, त्यावर परीक्षा होऊ शकते. प्रश्नपत्रिकेत 'एमसीक्यू'वर आधारित प्रश्न देता येईल. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास, वेळ वाढवून देण्याची सुविधा देता येऊ शकते, अशा शक्यता पालकांकडून व्यक्त होत आहेत. शाळेलाच परीक्षा केंद्र घोषित करा राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शाळेतील परीक्षा केंद्रांवर घेता येणे शक्य आहे. या पद्धतीने नियोजन करायचे झाल्यास, इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहेत, त्याच शाळेला परीक्षा केंद्र घोषित करून ऑफलाइन स्वरूपात परीक्षा घेता येऊ शकतात, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या पद्धतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शालेय विभागातील कर्मचाऱ्यांनाही ताण येणार नाही; तसेच परीक्षा सुरळीत पार पडतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3br24fb
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments