दहावी, बारावीच्या प्रश्नसंचात चुका; विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने उपलब्ध करून दिलेत. मात्र यामध्ये काही प्रश्न एकापेक्षा जास्त वेळा प्रसिद्ध करण्यात आले आहेत, तर वगळलेल्या अभ्यासक्रमाबाबतही प्रश्न देण्यात आले आहेत. यावरून पालक आणि विद्यार्थी नाराज असून सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या सरावासाठी ऑनलाइन प्रश्नसंच उपलब्ध केले आहेत. पहिल्या टप्प्यात बारावीच्या सात आणि दहावीच्या सहा विषयांचे प्रश्नसंच उपलब्ध केले आहेत. येत्या काही दिवसांत सर्व विषयांचे प्रश्नसंच मिळणार आहेत. लॉकडाउनमुळे शाळा अजूनही बंद असल्याने विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव पुरेसा झालेला नाही. यातच परीक्षाही ऑनलाइन घ्याव्या की ऑफलाइन घ्याव्यात, याबाबत चर्चा सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पालक, शिक्षक यांच्या मागणीनुसार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रश्नसंच उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले होते. यानुसार हे संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या संचांमध्ये काही चुका असल्याचे पालक आणि विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे पुढे येणारे प्रश्नसंच योग्य पद्धतीने तपासून अपलोड करावेत, अशी मागणी विद्यार्थी व पालक करत आहेत. यंदा दहावी व बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाबाबतचे प्रश्नही यामध्ये देण्यात आले आहे. यामुळे हे प्रश्नसंच अभ्यासपूर्णरित्या तयार झाले नसल्याची टीकाही होत आहे. तज्ज्ञांना सहभागी करून घेतले नाही प्रश्नसंच तयार करताना विषयाच्या अभ्यास मंडळातील सदस्यांना सहभागी करून घेतले नाही. याचबरोबर यासाठी आवश्यक ती छाननी प्रक्रियाही राबिवली नाही, अशी टीका अभ्यास मंडळाच्या माजी सदस्यांनी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rPTu0x
via IFTTT

Post a Comment

0 Comments