दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच; कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर परीक्षांसाठी तयारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचीच तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे ३० एप्रिलपर्यंत शनिवारी बारावीचा केवळ एकच पेपर येत आहे; तसेच राज्य सरकारने परीक्षार्थींना निर्बंधांतून सूट दिलेली असल्यामुळे या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यासाठी राज्य मंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पालकांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी करण्यात आली. दहावीच्या परीक्षेला साधारण १७ लाख, तर बारावीच्या परीक्षेला १५ लाख विद्यार्थी प्रविष्ठ होतात. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घ्यायच्या झाल्यास, सुमारे ३२ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागेल. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. त्याचप्रमाणे विद्यापीठांच्या ऑनलाइन परीक्षेत गोंधळ निर्माण झाला. सध्याच्या स्थितीत ऑनलाइन परीक्षा घेण्याचे कोणतेही प्रयोजन नाही. त्याचप्रमाणे या परीक्षेत गैरप्रकार व गोंधळ होण्याची शक्यता अधिक असल्याने, मंडळाकडून ऑफलाइन परीक्षेची तयारी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बारावीच्या एका पेपरला अडचण राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध; तसेच शनिवारी-रविवारी लॉकडाउन राहणार आहे. परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन्ही संत्रात होणार असल्याने, परीक्षेच्या कामकाजावर थोडा परिणाम होऊ शकतो. दहावीची परीक्षा गुरुवार २९ एप्रिलपासून सुरू होणार असून, शनिवारी कोणत्याच विषयाचा पेपर नाही. त्यामुळे या परीक्षेत अडचण येणार नाही. तर, बारावीची परीक्षा शुक्रवारी २३ एप्रिलपासून सुरू होणार असून, शनिवारी २४ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात हिंदी, तर दुपारच्या सत्रात इतर पर्यायी भाषांचे पेपर आहे. त्यामुळे केवळ एक पेपरला लॉकडाउनची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळवारी बैठक पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याच्या निर्णयानंतर, आज मंगळवारी ६ एप्रिल रोजी इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे; तसेच याच बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा होऊन त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांना अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. शिक्षक-कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा राज्यात दहावी-बारावी परीक्षेच्या कामकाजात असणाऱ्या शिक्षक-कर्मचाऱ्यांना लसीकरणाची तातडीने सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. येत्या काही दिवसात लस मिळाल्यास, दुसरा डोस देखील परीक्षा संपेपर्यंत पूर्ण होईल, असे शिक्षकांनी सांगितले. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fLgTNi
via IFTTT

Post a Comment

0 Comments