Also visit www.atgnews.com
दहावी, बारावीच्या परीक्षा अखेर लांबणीवर; विद्यार्थी-पालकांना दिलासा
करोना संक्रमणाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा अखेरीस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा मे अखेर तर दहावी परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री यांची यासंदर्भात महत्त्वाची बैठक आज पार पडली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्याची तयारी सुरू होती. मात्र, गेल्या दहा दिवसांत करोनाचा राज्यात उद्रेक झाला. करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमालीची वाढली असून, यात पालक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी असे परीक्षा प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातली माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. काय म्हणाल्या शिक्षणमंत्री? मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दहावी आणि बारावी हा जीवनातला महत्त्वाचा टप्पा आहे. आधीच अभ्यासाचा तणाव आणि त्यातच करोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. अशा परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची, हा मोठा प्रश्न होता. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शालेय शिक्षण विभागाची बैठक झाली आणि त्यात काही महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. म्हणून दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दहावीची परीक्षा जून महिन्यात होईल तर बारावीची परीक्षा ही मे अखेर होईल, जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. अन्य बोर्डांनाही आवाहन करणार राज्य सरकारने बोर्ड परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच पद्धतीने सीबीएसई आणि आयसीएसई या अन्य बोर्डांनीदेखील परीक्षा लांबणीवर टाकाव्यात असे आवाहन या बोर्डांना केले जाणार आहे, अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली. एप्रिल अखेर सुरू होणार होत्या परीक्षा... यापूर्वीच्या नियोजित वेळेनुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल पासून तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार होती. या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. म्हणूनच वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना कसे पाठवायचे हा मोठा प्रश्न पालकांपुढे होता. त्यातच येत्या आठवड्यात महाराष्ट्रात काही दिवसांचा लॉकडाऊनही पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षांवर अनिश्चिततेचे सावट होते. पण आता परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी-पालकांची जीव भांड्यात पडला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/324PvlF
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments