रविवारी एमपीएससीची दुय्यम सेवा परीक्षा होणार का? स्पर्धा परीक्षा विद्यार्थी पुन्हा चिंतेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय रविवारी घे तला. त्यामुळे येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. परीक्षेबाबत सरकारकडून एमपीएससी प्रशासनाला कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याने, संयुक्‍त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. त्यात शनिवारी व रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत असून, आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमपीएससीची परीक्षा वेळेत होणार का, असा प्रश्न पडला आहे. नव्या निर्णयानुसार परीक्षेच्या आयोजनाबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षेवरुन विद्यार्थी साशंक आहेत. दरम्यान, येत्या रविवारी होणाऱ्या परीक्षेसंदर्भात राज्य शासनाकडून काहीच सूचना आल्या नाहीत. एएमपीएससी प्रशासनाने मार्गदर्शक सूचनांनुसार परीक्षेची सर्व तयारी केली आहे. या परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ८२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. आता शनिवार व रविवार या दोन दिवशी लॉकडउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या परीक्षेच्या आयोजनाबाबत राज्य सरकारकडून स्पष्टता आलेली नाही, अशी माहिती एमपीएससीच्या सूत्रांनी दिली. परीक्षेबाबत तत्काळ सूचना द्या एमपीएससीच्या या परीक्षेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने रविवारी कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे नियोजन केले नाही. त्याचवेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवार ऐन करोनाच्या संकटात शहरात राहून अभ्यास करीत आहेत. रविवारच्या परीक्षेसाठी दुसऱ्या शहरात जाउन परीक्षा केंद्र गाठायचे झाल्यास, शुक्रवारी किंवा शनिवारी रात्री प्रवास करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउन आणि शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था बंद असल्याने, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र गाठायला त्रास होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत परीक्षेचा संभ्रम लवकरात लवकर दूर करावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. परीक्षेच्या आयोजनाहुन विद्यार्थ्यांमध्ये दोन गट करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे निधन झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. त्यातच काही विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्याने; तसेच सुरक्षेच्या कारणाहून परीक्षा पुढे ढकलण्याबाबत काही विद्यार्थ्यांचा गट मागणी करीत आहे. तर, दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाकडून परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होण्याबाबत आग्रह धरला जात आहे. त्यामुळे परीक्षेच्या आयोजनावरुन विद्यार्थ्यांमध्येही दोन गट निर्माण झाले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cPKYcV
via IFTTT

Post a Comment

0 Comments