कौशल्य विद्यापीठ कायद्याची आजपासून अंमलबजावणी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्यातील तरुणाईला एकात्मिक, समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आणि त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याच्या हेतूने राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सार्वजनिक-अर्थसहाय्यित) स्थापन करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिलपासून अमलात आणण्यात येत आहे, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी दिली. महाराष्ट्रात असलेले उद्योग समूहांचे मोठे जाळे व रोजगाराच्या प्रचंड संधी विचारात घेता राज्यात सार्वजनिक कौशल्य विद्यापीठाची स्थापना करणे आवश्यक होते. उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण व्हावे असा कौशल्य विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये प्रामुख्याने महानगरांमध्ये बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, औषधे, आतिथ्य, तेल, वायू, खनिज, एफएनसीजी, ऊर्जा यांसारख्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच खासगी कंपन्यांची मुख्य कार्यालये कार्यरत आहेत. मुंबई ही चित्रपट, दूरचित्रवाणी उद्योगाचे माहेरघर म्हणूनही ओळखली जाते. त्यामुळे अशा सर्वक्षेत्रांशी संबंधित बँकिंग, वित्त, रचना, नावीन्य, संशोधन क्षेत्रात पुढाकार घेऊन तसे मनुष्यबळ निर्माण केल्यास त्याचा राज्याला फायदा होईल. कौशल्य विकास विभागामार्फत राज्यात सहा विभागीय ठिकाणी 'सेंटर ऑफ एक्सलेन्स' उभारण्याचेही प्रस्तावित आहे. ही सहा केंद्रे राज्य कौशल्य विद्यापीठाची विभागीय केंद्रे म्हणून काम पाहतील, असे त्यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dVq9Ms
via IFTTT

Post a Comment

0 Comments