Also visit www.atgnews.com
दहावी, बारावी परीक्षा पुढे ढकलण्याने पेच; 'या' राष्ट्रीय परीक्षा हुकण्याची चिन्हे
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील किमान १५ संस्थांमधील प्रवेशाची संधी हुकण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाची परीक्षा व राष्ट्रीय स्तरावरील प्रक्रियेत सारखेपणा नसेल. दहावी, बारावीचा निकाल हाती येईपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील प्रक्रिया संपेल का, याची चिंता विद्यार्थी, पालकांना सतावत असून राज्य सरकार कसा तोडगा काढणार याकडे लक्ष लागले आहे. करोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक एप्रिल-मेमध्ये निश्चित करण्यात आले होते. वेळापत्रक जाहीर झाले, बारावीचे हॉलतिकिटही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले, परंतु परिस्थिती लक्षात घेत राज्यशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी (१२ एप्रिल) रोजी घेतला. मे-जूनमध्ये या परीक्षा होतील असे सांगण्यात आले. लांबणाऱ्या परीक्षेमुळे अनेक विद्यार्थी, पालकांना करिअरच्या वाटा निवडण्यासाठीच्या संधीमध्ये अडचणी निर्माण होतील अशी चिंता वाटते आहे. राष्ट्रीय पातळीवर जेईई, नीट अशा विविध परीक्षांच्या प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित आहे. करोना पार्श्वभूमीवर यंदा 'जेईई' चार वेळा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. निश्चित वेळापत्रकानुसार या परीक्षा होतील. अशावेळी राज्य मंडळाच्या परीक्षा लांबल्यामुळे निकाल येण्यास ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर गुणपत्रिका, कागदपत्रांची जुळवाजुळव त्यासाठी लागणारा विलंब. त्यात मे-जूनचे वेळापत्रकही निश्चित असेल की, नाही याची खात्री नाही. अशावेळी राष्ट्रीय पातळीवरील संधीचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील काही परीक्षांच्या तारखा अशा एनडीए परीक्षा १८ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. जेईई तिसरी फेरी २७ ते ३० एप्रिल, चौथी फेरी २४ ते २८ मे दरम्यान होणार आहे. १ ऑगस्टला नीट, ३ जुलै रोजी जेईई अॅडव्हान्स, क्लॅट १३ जून, भारताबाहेरील कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी 'एसएटी' परीक्षा आठ ते पाच जून, एसएससी-सीजीएल २९ मे ते ७ जून, बीट्स पिलानी २४ ते ३० जून दरम्यानचे वेळापत्रक आहे. बारावीची परीक्षा मेच्या शेवटच्या आठवाड्यात ते जूनच्या शेवटापर्यंत चालेल. त्यानंतर प्रात्यक्षिक, मग निकाल. त्यामुळे निकालाला ऑगस्ट उजाडेल. महाराष्ट्रातील परिस्थिती विचारात घेता विविध राज्यातील मंडळे, केंद्रीय स्तरावरील संबंधित प्राधिकरणे प्रक्रियेत बदल करतील का, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. विद्यार्थ्यांचा आरोग्याचा विचार करता निर्णय योग्य आहे असे म्हणावे लागेल. अनेक मुलांना वाटते अभ्यासाला वेळ मिळाला तर, काहींना परीक्षा होऊन जावी असे वाटत होते. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांचा विचार केला तर त्यांचा निकाल लागेल, परंतु आपल्या मंडळाच्या निकालाला उशिर होईल. त्या संस्था काही राज्य मंडळाच्या निकालाची वाट बघत नाही. मुलांचा जीव महत्त्वाचा आहे सोबत त्यांचे करिअर सुद्धा. काही प्रवेश त्यांच्या हातून निघून जाण्याची भीती आहे. रजनीकांत गरुड उपप्राचार्य, देवगिरी ज्युनिअर कॉलेज. परिस्थितीचा विचार करीत राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. इतर मंडळांशीही राज्य सरकार चर्चा करणार आहे, परंतु ते कितपत मान्य करतील हा प्रश्न आहे. देशात आपल्याकडे करोनाची स्थिती गंभीर आहे. काही राज्यात तशी परिस्थिती नसल्याने ते त्यांच्या वेळेनुसार प्रक्रिया राबवतील. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचीही प्रक्रिया त्यांच्या वेळापत्रकानुसार सुरू आहे. त्यामुळे आपल्या मुलांसमोर संधी गमावण्याची भीती आहे. मोहतशीम अली खान, उपप्राचार्य, मौलाना आझाद ज्युनिअर कॉलेज.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dg0dvI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments