Also visit www.atgnews.com
राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय?
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य सरकार येत्या काही दिवसांत नव्याने लॉकडाउन लावण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी ऑफलाइन परीक्षा वेळेवर सुरू होतील का, असा प्रश्न विद्यार्थी-पालकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. एमपीएससीची पदभरती परीक्षा पुढे ढकल्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पुढे आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्याची तयारी सुरू आहे. मात्र, गेल्या दहा दिवसांत करोनाचा राज्यात उद्रेक झाला. करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमालीची वाढली असून, यात पालक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी असे परीक्षा प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून या परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एमपीएससीची रविवारी ११ एप्रिल रोजी होणारी दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने, तोच नियम दहावी-बारावीच्या परीक्षांना लावण्याची शक्यता आहे.इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरू होत असल्याने, साधारण १० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. तर, दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यातच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साधारण १४ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर होण्याची शक्यता आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परीक्षा वेळेत सुरू होणार की पुढे ढकलण्यात येतील, याबाबत विद्यार्थी-पालकांच्या मनात संभ्रम आहे. या दोन्ही परीक्षांच्या आयोजनाबाबत विद्यार्थी-पालकांच्या मनातील संभ्रम तातडीने दूर होण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य मंडळ आणि शालेय शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. परीक्षांबाबत निर्णय जाहीर करू दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या नियोजनाबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची नुकतीच ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत अधिकारी, पालक, लोकप्रतिनिधी आदी सहभागी झाले होते. या बैठकीत अनेकांनी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचे लसीकरण करण्यासो परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली, तर काहींनी परीक्षा जूनच्या अखेरीस घेण्यात याव्यात, असे मत मांडले. या परीक्षांबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, मात्र विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवावा, असे सांगितले. शिक्षणमंत्र्यांची बनावट पोस्ट व्हायरल दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द होण्यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या ट्विटर हँडलवरील पोस्टचा फोटो काढून, त्याला मॉर्फ करण्याचा प्रकार समोर आला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना असायन्मेंट शाळेत द्याव्या लागतील, अशी बनावट पोस्ट तयार करण्यात आली आहे. ही पोस्ट व्हायरल सुद्धा करण्यात आली. त्यामुळे या चुकीच्या बनावट पोस्टची वर्षा गायकवाड यांनी गंभीर दखल घेतली आहे; तसेच विद्यार्थी-पालकांनी अधिकृत ट्विटर हँडलच्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. इयत्ता बारावी परीक्षा लेखी परीक्षेचा कालावधी - २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी - २२ मे २०२१ ते १० जून २०२१ विद्यार्थी संख्या - सुमारे १५ लाख इयत्ता दहावी परीक्षा लेखी परीक्षेचा कालावधी - २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी -२१ मे २०२१ ते १० जून २०२१ विद्यार्थी संख्या - सुमारे १७ लाख
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d7sXGX
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments