'लॉ'च्या परीक्षा ऑनलाइन घ्या; विद्यार्थ्यांची मागणी

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेले लॉकडाउन, यानंतर मराठा आरक्षणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यामुळे विधी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा घेण्यापासून प्रवेश प्रक्रियेला बराच विलंब लागला. २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष संपत आले, तरी विधी अभ्यासक्रमाची अद्याप प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे विधी (लॉ) अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये चारही सत्रांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. गेल्या वर्षभर असलेले लॉकडाउनमुळे विलंबाने सीईटीची परीक्षा झाली. अद्याप विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यातच मुंबई विद्यापीठाने १४ जूनपासून प्रथम सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. म्हणजेच मागील वर्ष हे विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रियेमध्येच गेल्याने त्यांचे संपूर्ण वर्ष वाया गेले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. १४ जून रोजी प्रथम सत्राची परीक्षा झाल्यानंतर पुढील सत्राच्या परीक्षा कशा प्रकारे होणार याबाबत कोणतेही स्पष्टीकरण विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमधील संभ्रमाचे वातावरण दूर करण्यासाठी व त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये तीन महिन्यांच्या फरकाने चारही सत्रांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलकडून करण्यात येत आहे. तीन महिन्यांच्या फरकाने ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी मानसिकदृष्ट्या आपण तयार असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात तीन महिन्यांच्या फरकाने चारही सत्र परीक्षा घेण्याची मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पवार यांनी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mx2pCm
via IFTTT

Post a Comment

0 Comments