आरटीई प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी

म.टा. प्रतिनिधी, नागपूर शिक्षण संचालनालयाने २५ टक्के प्रक्रिया सुरू करून प्रवेश यादी जाहीर केली. सद्यस्थितीत शाळा बंद असल्याने प्रवेशप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे ही प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी आरटीई फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे यांनी केली आहे. आरटीई कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना पहिली ते आठवीमध्ये मोफत शिक्षण देण्यात येते. सुमारे चार लाख विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. परंतु, सरकारने चार वर्षांपासून शाळांना परतावा दिला नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आर्थिक अडचणीत आले आणि शालेय खर्च व वेतनावर त्याचा परिणाम झाला. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ८ मार्च रोजी निधी देण्याचे लेखी आश्वासन दिले. १ हजार ६५० कोटी रुपयांची मागणी केली असता ५० कोटी रुपये मंजूर केले. आरटीईचे प्रवेश द्यावेत, असे बंधन लावणारे सरकार परतावा देत नाही. केंद्र सरकार ४ हजार ४०१ रुपये दिल्याचे सांगते तर, ४८५ कोटी रुपये मिळाल्याचे राज्य सरकार सांगत आहे. शाळांना सर्व रक्कम देत नाही किंवा नियोजन करत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी काळबांडे यांच्यासह उपाध्यक्ष राम वंजारी, सचिव अर्चना ढबाले, रमेश शेंडे, मुकेश अग्रवाल, राजेश भांगे, रमेश डोकीरमारे, सुभाष धरमठोक, प्रदीप सुतोणे, संजय बोम्बटकर, राजेंद्र अतकर, प्रकाश मासुरकर आदींनी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3v5tS0I
via IFTTT

Post a Comment

0 Comments