पहिली ते आठवीच्या परीक्षा, मूल्यमापन कसे? मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेले शैक्षणिक वर्ष संपत आल्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल कसे जाहीर करावे, असा प्रश्न राज्यातील सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे. शहरी भागातील अनुदानित शाळांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या असून, आता निकालाच्या कार्यवाहीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या सूचनांची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आणि ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशा प्रमाणात साधनांची उपलब्धता नसल्याने, विद्यार्थ्यांना शिकण्यात अडचणी आल्या. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात या अडचणी अधिक होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा होणार आहेत. त्यानंतर निकाल जाहीर होईल. मात्र, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा घोषित करावा, असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे. इयत्ता पहिली ते आठवीचा निकाल सर्वंकष मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केला जातो. मात्र, यंदा जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका अशा सरकारी शाळांमध्ये दोन चाचण्या आणि दोन संकलित मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊ शकले नाही, अशी माहिती शिक्षकांनी दिली आहे. शहरी भागातील अनुदानित शाळांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या असून, निकाल तयार केला आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष संपत असून, आता गुणपत्रके तयार करून निकाल जाहीर करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबण्यात यावी, याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन सूचना मिळाल्या नाहीत, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे आणि त्यांची वर्गोन्नती कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शन तत्काळ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक दिनकर टेमकर यांना केली आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रक न दिल्यास त्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास अडचण निर्माण होते. जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी आणि सरकारी वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी गुणपत्रके आवश्यक असल्याने मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्याची मागणी समितीने केली आहे. हेही वाचा: इयत्ता पहिली ते आठवीच्या मूल्यमापन कार्यपद्धती; तसेच नववी व अकरावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत लवकर सूचना येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 'निकालांबाबत सूचनांची शक्यता' राज्यातील अनेक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांनी इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या आहेत. मात्र, त्यांचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. शालेय शिक्षण विभागाकडून ऑनलाइन परीक्षा व निकालांबाबत सूचना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सूचनांची प्रतीक्षा शाळा व ज्युनिअर कॉलेजांकडून करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष संपत आल्याने, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धती आणि निकाल पद्धती याबाबत सर्वंकष माहिती असणारा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढायला हवा. येत्या काही दिवसांत आदेश मिळाल्यास राज्यातील शाळांच्या कार्यपद्धतीत एकवाक्यता राहील. - विजय कोंबे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wh0iH4
via IFTTT

Post a Comment

0 Comments