'दहावी परीक्षा रद्द'चा अधिकृत निर्णय जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने बुधवारी शासन निर्णयाद्वारे अधिकृतपणे जाहीर केला. दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक/प्रमाणपत्र देण्याबाबत अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे आदेश देण्यात येतील, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणाच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कागदोपत्री जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमावस्थेत होते. त्यामुळे काही तांत्रिक अडचणीही निर्माण होत होत्या. याबाबत गेल्या आठवड्यात 'महाराष्ट्र टाइम्स'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर शिक्षणमंत्र्याच्या घोषणेनंतर बावीस दिवसांनी परीक्षा रद्द करण्याबाबतचा अधिकृत निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आता दहावीच्या परीक्षा अधिकृतरीत्या रद्द झाल्या असून, विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळाला आहे. 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी होणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) रद्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विनियम १९७७ मध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत मंडळाने यथोचित कार्यवाही करावी,' अशी माहिती निर्णयाद्वारे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bnoeQc
via IFTTT

Post a Comment

0 Comments