दहावीनंतरसाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याची मागणी

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेणाऱ्या सरकारने पुढील प्रवेशासाठी एमसीक्यूवर आधारित ऑनलाइन परीक्षा घ्यावी, अशी मागणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्वत परिषद सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी केली आहे. दहावीतील सुमारे १७ लाख विद्यार्थी अकरावी, पॉलिटेक्निक, आयटीआयसाठी पात्र झाले. राज्यात अधिकाधिक नऊ लाख विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण उपलब्ध करण्याची क्षमता संस्थांची आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे काय करणार व पुढील वर्गातील प्रवेशाबाबत कोणते धोरण आहे, असा सवाल डॉ. खडक्कार यांनी उपस्थित केला आहे. सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याने कुणाला किती गुण मिळाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा स्थितीत कोणत्या आधारे प्रवेश देणार, असाही सवाल उपस्थित होतो. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रवेश कोणत्या आधारे राहतील, याचा निर्णय नंतर जाहीर करण्याचे सरकारने जाहीर केले. परीक्षा रद्द करून काय साध्य झाले. उलट विद्यार्थी व पालकांवरील मानसिक ताण कमी न होता आणखी वाढला आहे. पुढील प्रवेशाची चिंता त्यांच्यासमोर आहे. परीक्षा रद्द करण्यासोबत पुढील प्रवेशाची कार्यप्रणाली जाहीर करणे अधिक संयुक्तिक ठरले असते. सर्वांना उत्तीर्ण केल्याने हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना आवडते महाविद्यालय व अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे. ही सर्व स्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व विद्यापीठांप्रमाणे अकरावी, पॉलिटेक्निक व आयटीआयसाठी बहुपर्यायी निवड प्रश्नाच्या (एमसीक्यू) आधारे ऑनलाइन प्रवेशपूर्व परीक्षा घेतल्यास विद्यार्थी व पालकांचा प्रवेशाचा ताण कमी होईल, असेही डॉ, संजय खडक्कार यांनी म्हटले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nUZV19
via IFTTT

Post a Comment

0 Comments