SSC Result 2021: SCERT ने जाहीर केली नववी उत्तीर्णांची आकडेवारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनात नववीच्या गुणांचा समावेश करणे शक्य असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून () स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील सुमारे १८ लाखांहून अधिक विद्यार्थी नववीमध्ये उत्तीर्ण झाले असून, त्यांची संपूर्ण माहिती सरल प्रणालीत समाविष्ट करण्यात आल्याने दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी त्याचा उपयोग होईल, असे 'एससीईआरटी'कडून सांगण्यात आले आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारेच लागेल, असे सांगताना शुक्रवारी मूल्यमापनाबाबतीतील सविस्तर धोरण जाहीर केले. यामध्ये विद्यार्थ्यांचे ५० टक्के गुणांकन नववीच्या गुणांच्या आधारे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून शिक्षण विभागावर टीका केली जात आहे. नववीच्या परीक्षाच झाल्या नाहीत, तर गुणांकन कसे करणार, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. याला 'एससीईआरटी'ने उत्तर दिले असून, २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये नववीची परीक्षा दिलेल्या आणि त्यातून उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार ही आकडेवारी देण्यात आली असून, सरल प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांनी आकडेवारी नमूद केली असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. 'एससीईआरटी'ने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये १९ लाख ३४ हजार ९४ विद्यार्थ्यांनी नववीची परीक्षा दिली आहे. त्यातील १८ लाख ३१ हजार ३४४ विद्यार्थी उत्तीर्ण, तर २४ हजार १०७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. ७८ हजार ६४३ विद्यार्थ्यांची माहिती नमूद करण्यात आली नाही. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये नववीच्या गुणांचा अंतर्भाव करणे शक्य असल्याचे 'एससीईआरटी'कडून सांगण्यात आले आहे. नववीच्या विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी (२०१९-२०) जिल्हा परीक्षार्थी उत्तीर्ण अनुत्तीर्ण पुणे १,५३,९११ १,४९,८१२ ४०९९ मुंबई (शहर) १७,०६४ १५,८४९ १२१५ मुंबई (जिल्हा) १,५०,३१४ १,४५,८५१ ४४६३ ठाणे १,३१,०७३ १,२६,७२४ ४३४९ नाशिक १,०८,०८२ १,०७,१७६ ९०६ नववीच्या गुणांकनावर मूल्यमापन होऊ शकत नाही, हा आधार चुकीचा असून, त्यासाठीच 'एससीईआरटी'ने नववीच्या निकालांचा तपशील जाहीर केला आहे. राज्याचा हा तपशीला पाहिला, तर साधारण ९० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या असून, त्यांचे गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी गृहित धरणे शक्य आहे. - विकास गरड, उपसंचालक, 'एससीईआरटी' अडीच लाख विद्यार्थी शालाबाह्य? शैक्षणिक वर्षे २०१९-२० मध्ये नववीच्या एकूण १९ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे १७ लाख विद्यार्थीच यंदा दहावीच्या परीक्षेला पात्र झाले होते. उरलेले जवळजवळ अडीच लाख विद्यार्थी शालाबाह्य झाले का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 'एससीईआरटी'कडून मात्र याचे खंडन करण्यात आले आहे. हे विद्यार्थी शालाबाह्य झालेले नसून, ते इतरत्र स्थलांतरीत झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचाही तपशील जाहीर करणार असल्याचे 'एससीईआरटी'कडून नमूद करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RYfpG9
via IFTTT

Post a Comment

0 Comments