१० वी, १२ वी परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची बोर्ड फी परत करण्याची मागणी

मुंबई: दहावी, बारावीच्या परीक्षाच रद्द झाल्या असल्याने एसएससी बोर्डाने विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत करावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडे केली आहे. विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेचे शुल्क सरासरी ४२५ रुपये तर बारावी परीक्षेचे शुल्क सरासरी ६०० रुपये आहे. १० वीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे सराव चाचणी, स्वाध्याय, प्रकल्प, गृहकार्य, तोंडी परीक्षा यासारखे तंत्र वापरून करावयाचे आहे. शिक्षण मंडळाचा विद्यार्थ्यांना देण्यात येणारे साहित्य, भरारी पथकाचा खर्च, प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावरील खर्च वाचला आहे. यासोबतच लेखी परीक्षाच रद्द झाल्याने परीक्षक, नियामक व मुख्य नियामक यांना देण्यात येणारा मानधनरुपी खर्चही मंडळाचा वाचला आहे. राज्यात दहावीला यंदा १६ लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले असून परीक्षा शुल्कापोटी राज्य शिक्षण मंडळाकडे जवळपास ७० कोटी रुपये जमा झाले आहेत. यातील प्रश्नपत्रिका छपाईचा खर्च वजा करता राहिलेली रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्यात यावी जेणे करून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ती वापरता येईल, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शिक्षण मंडळाकडे केली आहे. कोविड काळात अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे रोजगार व धंदे बंद पडल्याने राज्यातील जवळपास २ लाख नववी उत्तीर्ण झाले परंतु त्यांनी दहावीचे फार्म भरले नाही त्याची कारणेही शासनाने शोधावी व या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे असेही अनिल बोरनारे यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xlPur3
via IFTTT

Post a Comment

0 Comments