डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना करोनाकाळातही नोकरी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाकाळात मागील वर्षभरात आरोग्य क्षेत्र वगळता इतर कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळाली असे कुणीही सांगू शकले नाही. उलट अनेकांना रोजगार गमवावा लागला, तर अनेकांच्या वेतनात कपात झाली. अशा परिस्थितीत डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यातील काही जण रुजू झाले आहेत, तर काही जण लवकरच रुजू होणार आहेत. अभ्यासक्रम सक्षम करण्याच्या उद्देशाने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. यात गणिताचा उपयोजित भाग ठेवण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती कमी करण्यात आली आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना संस्थेत चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे या उद्देशाने सुरुवातीचे दहा दिवस ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्राथमिक गणित, भौतिकशास्त्र आणि संवादकौशल्य परिपक्व करून घेतले जाते. यानंतर एक छोटेखानी चाचणी घेण्यात येते. यात कच्च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्गांचे आयोजन करून शिक्षण दिले जात असल्याचे तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक अभय वाघ यांनी सांगितले. काही उद्योगांसोबत सामंजस्य करार करून अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. त्या अभ्यासक्रमात डिप्लोमा मिळवलेल्या विद्यार्थ्याला त्या कंपन्यांमध्ये नोकरीचा मार्गही खुला होतो. याचबरोबर नियमित अभ्यासक्रमात ५० टक्के प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात आला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना उद्योगात काय सुरू आहे याचा थेट अनुभव घेता येतो. विद्यार्थ्याचे प्रकल्प कौशल्य तपासण्यासाठी लघु व सूक्ष्म प्रकल्प तयार करण्याचाही समावेश अभ्यासक्रमात करण्यात आल्याचे वाघ यांनी सांगितले. यामुळे हे विद्यार्थी अधिक रोजगारक्षम झाले. त्यामुळे यंदाच्या करोनाकाळातही शासकीय डिप्लोमा शिक्षण संस्थांच्या सुमारे २० टक्के विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. हे या अभ्यासक्रमाचे यश असल्याचे वाघ म्हणतात. करोनाकाळापूर्वी २०१९ मध्ये ६७ हजार विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात यश मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. इंटर्नशिपसारख्या उपक्रमांमुळेही विद्यार्थ्यांना रोजगारासाठी सहकार्य मिळत आहे. यंदाही इंटर्नशिपसाठी खूप प्रयत्न करण्यात आले. त्याला काही प्रमाणात यश आले. मात्र सर्वांना लाभ मिळू शकला नाही, असे वाघ म्हणााले. तंत्रनिकेतनचे मोठे यश राज्यातील कोल्हापूर, रत्नागिरी, नांदेड, जालना, औरंगाबाद आदी भागांतील शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाले आहेत. करोनाकाळात शिक्षण संपल्याने नोकरी मिळवणे अवघड होणार असल्याची भावना व्यक्त होत असताना या विद्यार्थ्यांना मिळालेला रोजगार हे तंत्रनिकेतनचे मोठे यश असल्याची भावना व्यक्त होत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये डिप्लोमा प्रवेशात २० टक्के वाढ झाली आहे. आगामी काळात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षाही वाघ यांनी व्यक्त केली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gQWBkn
via IFTTT

Post a Comment

0 Comments