हिवरे बाजारप्रमाणे राज्यात अन्यत्रही शाळा सुरू व्हाव्यात; सरकारला पत्र

म.टा. प्रतिनिधी, नगर करोनामुक्त गाव संकल्पना सूचविल्यानंतर आदर्शगाव हिवरे बाजाराने आता करोनामुक्त गावे व वाड्यावस्त्यांवरील शाळा प्रत्यक्षपणे सुरू कराव्यात, अशी संकल्पना सरकारला सूचविली आहे. हिवरे बाजारमध्ये १५ जूनपासूनच माध्यमिक शाळा सुरू झाली आहे. ती कशा पद्धतीने सुरू केली, याचा तपशील कळवून राज्यातही असा निर्णय घ्यावा, असे सरकारला सूचविण्यात आले आहे. करोनामुक्त झालेल्या गावांत काही नियम करून आणि दक्षता घेऊन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू करता येऊ शकतात, अशी सूचना आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चु कडू यांना यासंबंधी पत्र लिहिले आहे. त्यामध्ये गावात कशा पद्धतीने शाळा सुरू केली, राज्यात अन्यत्र शाळा सुरू करण्यासाठी काय करता येईल, याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, या आदर्श गावात लोकांचा सहभाग व सामाजिक शिस्त असल्यामुळे राज्यातील पहिले करोनामुक्त गाव झाले. त्याच अनुभवातून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी,पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व ग्रामपंचायत यांनी स्वत:च्या जबाबदारीवर १५ जूनपासून ५ ते ७ वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ८ ते १० यशवंत माध्यमिक विद्यालय सुरु केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी अतिशय आनंदी आहेत. गेली ८ दिवस कुठल्याही प्रकारची अडचण जाणवली नाही. हिवरे बाजार गाव १५ मे २०२१ रोजी करोनामुक्त झाले त्यात करोना सुरक्षा मुख्य समितीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक काम करत होते. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांचेशी शिक्षकांचा संवाद सुरू होता. त्यातूनच दिनांक १६ मे ते ३० मे या कालावधीत प्रत्यक्षात शाळा सुरु करणेबाबत विद्यार्थी व पालक सर्वे करून प्रत्यक्षात चर्चा केली आणि त्यांचे मत जाणून घेतले. त्यातून असे लक्षात आले की, विद्यार्थी लेखन, वाचन विसरूनच गेलेले आहेत. यातून ग्रामीण भागात ऑनलाईन अभ्यासक्रमात इंटरनेट व त्या अनुषंगिक इतर सोयीसुविधा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यातून मुलांचे व पर्यायाने त्या कुटुंबाचा भविष्यकाळच अंधकारमय होण्याची भीती आहे. आपल्याला करोना बरोबरच रहायचे आहे हे लक्षात आल्यामुळे प्रथमतः शिक्षकांची तदनंतर पालकांची व ग्रामपंचायत करोना सुरक्षा समितीची बैठक घेऊन हिवरे बाजार येथील विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी करोनाविषयक जबाबदारी स्वीकारली आणि शिक्षकांनी अध्यापनाचे काम करण्याची जबाबदारी स्वीकारून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. जी गावे,वाडया वस्त्या व पाडे यामध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही, तसेच ज्या गावात करोना आला परंतु उत्तम नियोजनातून करोना मुक्त गाव करण्यात आली अशा ठिकाणी करोनाविषयक जबाबदारी पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी घेतल्यास जिल्हा परिषदेच्या संबिधीत विभागामार्फत परिस्थितीची खातरजमा करून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षकांचीही घेतली जबाबदारी हिवरे बाजारमध्ये शाळा सुरू झाल्याचे समजल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले. शिक्षणमंत्र्यांनी शाळा बंद करण्यासाठी आदेश देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शिक्षक आणि त्यांच्या संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे मंगळवारी पुन्हा शिक्षक-पालक आणि ग्रामपंचायतीची बैठक झाली. त्यामध्ये शिक्षकांवर केवळ अध्यापनाची जबाबदारी राहील, बाकीचे जबाबदारी गावाची राहील, अशी लेखी हमी शिक्षकांना देण्यात आली. त्यामुळे आता १ ली ४ थीची प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35JN7Cs
via IFTTT

Post a Comment

0 Comments