३१ टक्के जागा अजूनही रिक्त; 'आरटीई' प्रवेशासाठी शनिवारी अखेरची मुदत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्या, शनिवारअखेर मुदत आहे. केवळ दोन दिवस शिल्लक असूनही नाशिक जिल्ह्यातील शाळांमधील प्रवेशासाठीच्या ३१ टक्के जागा अद्यापही रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. 'आरटीई' अंतर्गत देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे दिसून आले आहे. आरटीई प्रवेशांची मुदत संपायला केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला असताना जिल्ह्यतील ४५० शाळांमधील ४ हजार ५४४ पैकी केवळ ३ हजार १५२ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी जिल्ह्यामध्ये १३ हजार ३३० अर्ज दाखल झाले होते. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ही प्रक्रिया राबविली जात आहे. ११ जूनपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, दीड महिन्यांचा अवधी मिळूनही ३१ टक्के प्रवेश अद्याप बाकी असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातही जवळपास ५८ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, ३७ हजारांच्या आसपास प्रवेश अद्याप बाकी आहेत. 'आरटीई' प्रवेशांसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करणे, इतर सर्व बाबींची पूर्तता यासाठी जवळपास आठवडाभराचा काळ जाणार आहे. त्यानंतर उर्वरित जागांसाठी प्रतीक्षा यादीतील मुलांची नावे जाहीर केली जाणार आहेत. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. शेवटची संधी गेल्या दोन वर्षांपासून प्रवेशासाठी मुदतवाढ मिळत असल्याचे चित्र आहे. परंतु, यंदा मात्र आरटीई प्रवेशांसाठी मुदतवाढ दिली जाणार नसून, ३१ जुलैपर्यंत पालकांना आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. प्रवेशाची ही अखेरची संधी असून, त्यानंतर उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 'आरटीई' प्रवेश शाळा : ४५० उपलब्ध जागा : ४,५४४ दाखल अर्ज : १३,३३० निश्चित प्रवेश : ३,१५२


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fdDnWi
via IFTTT

Post a Comment

0 Comments