दहावी, बारावी परीक्षेसाठी १७ नंबर फॉर्म भरताय? जाणून घ्या महत्वाची अपडेट

Maharashtra Education Department: दहावी आणि बारावीच्या परीक्षेत १७ नंबर फॉर्म भरुन खासगीरित्या सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय विभागातर्फे महत्वाची अपडेट देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना खासगीरित्या प्रवेशाचा अर्ज २ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून करता येणार आहे आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज ऑनलाइन स्वीकारण्याच्या मुदतवाढीच्या तारखांच्या तपशील पुढे देण्यात आला आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीमध्ये नावनोंदणी अर्ज आणि ऑनलाइन शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. २३ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याची पावती, दोन फोटो आणि मूळ कागदपत्रे शाळेमध्ये किंवा ज्युनिअर कॉलेजमध्ये जमा करणे आवश्यक आहे. खासगी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावीसाठी एक हजार रूपये नोंदणी शुल्क तर १०० रूपये प्रक्रिया शुल्क असेल तर इयत्ता बारावीसाठी ५०० रूपये नोंदणी शुल्क तर १०० रूपये प्रक्रिया शुल्क असेल. एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही, तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या किंवा प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी. विद्यार्थ्याना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र अथवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर सूचना वाचून अर्ज भरावेत तसेच अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२०- २५७०५२०७/ २५७०५२०८ अथवा २५७०५२७१ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BAegFG
via IFTTT

Post a Comment

0 Comments