अकरावीसाठी पुन्हा संधी; आजपासून विशेष प्रवेश फेरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक प्रवेशाच्या तीन फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या, स्पॉट अॅडमिशनची सुविधा, प्रवेश संपल्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वाने विशेष फेरी राबवल्यानंतरही अकरावीसाठी आजपासून प्रवेशाची अजून एक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या फेरीत ३० डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करता येणार आहेत. राज्यात नाशिकसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती आणि नागपूर या महानगरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने अकरावीच्या प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. जवळपास सात फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया संपल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, त्यानंतरही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती येथील २७० विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश देण्याची विनंती केली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना २८ ते ३० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयामार्फत महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे. करोना परिस्थितीमुळे अनिश्चितता, माहिती वेळेत न मिळणे, पालकांचे स्थलांतर या कारणांमुळे प्रवेश न घेतल्याची कारणे या विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालकांपुढे मांडली आहेत. ही सर्व कारणे विचारात घेऊन कोणीही विद्यार्थी प्रवेशांपासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालनालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ही फेरी शिक्षण उपसंचालक स्तरावर राबविली जाणार असून, रिक्त जागांचा तपशील विद्यार्थ्यांना दाखवून त्यांच्या सोयीचे महाविद्यालय प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उशिरा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांची असणार आहे. ...अशी असणार प्रक्रिया विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि. २८) नवीन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे, शिक्षण उपसंचालक स्तरावरून विद्यार्थ्यांना रिक्त जागा दाखवणे, विद्यार्थ्यांची पसंती आणि रिक्त जागा तपासून प्रवेश द्यावा लागणार आहे. २९ ते ३० डिसेंबर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. ३० डिसेंबरला संबंधित महाविद्यालयाला झालेले प्रवेश वेबसाइटवर अपलोड करावे लागणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32D9tY4
via IFTTT

Post a Comment

0 Comments