बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना विषययोजनेसंदर्भात आणि काही तांत्रिक अडचणी येत असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे मंडळाने कळवले आहे. आता HSC 2021 परीक्षेसाठी नियमित शुल्कासह २८ जानेवारीपर्यंत तर विलंब शुल्कासह ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह १९ ते २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना या कालावधीत अर्ज भरणे शक्य होणार नाही अशा विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान अर्ज भरण्याची संधी शिक्षण मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ या वर्षासाठीच या विषयांची परीक्षा देण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना फक्त यंदाच्या वर्षापुरती जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिली आहे. तसेच जुन्या विषयांची परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्या विषयात किंवा अन्य विषयांत नापास होतील त्यांना पुन्हा तोच विषय घेऊन फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XUyZTa
via IFTTT

Post a Comment

0 Comments